मराठा आरक्षणाच्या प्रश्नी ठाकरे सरकारने फसवल्याचा आरोप खासदार संभाजीराजे यांनी केला आहे. राज्य सरकार हातात असणार्या गोष्टीही का करत नाही? मराठा समाजाला सरकारने फसवले आहे. सारथी ही संस्थाही सरकारने बुडीत खाती घातली. अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकारने काय दिले? असे प्रश्न संभाजीराजे यांनी विचारले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होऊ देणार नाही. कारण ही परीक्षा झाली तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील.
सिद्धार्थ शिंदे नावाचा वाईचा मुलगा आहे. सध्या कोरोनाबाधित आहे तो कसा परीक्षा देणार? असाही प्रश्न खासदार संभाजीराजेंनी विचारला आहे. परीक्षेला बसणारी दोन लाख मुलं कोरोनाबाधित झाली तर त्याला कोण जबाबदार, असाही प्रश्न त्यांनी विचारला.
एमपीएससीची परीक्षा घेण्यासाठी सरकार घाई का करते आहे? यामागे काही षड्यंत्र आहे का कळत नाही. ज्यांची वयाची मर्यादा संपेल त्यांची वयाची अट शिथिल करून मर्यादा वाढवा, सर्वांना सोबत घेऊन चला, अशी माझी सरकारला सूचना आहे, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
राज्य सरकार ऐकत नसेल तर मराठा समाज एमपीएसीची केंद्रे बंद करेल, असेही संभाजीराजेंनी म्हटले आहे. मराठा समाजातील वकिलांनी काय करायला हवे हे ठरवावे, आंदोलनाची दिशा ठरवावी. मराठा समाज आक्रमक झाला आहे. आत्तापर्यंत अनेक लोकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र बंद करणार नाही. मात्र, मराठा समाज एमपीएससीचे केंद्र बंद करेल, असाही इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.