घरताज्या घडामोडीनितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री

नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री

Subscribe

मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान मोदींचे स्पष्ट संकेत

नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बिहारचा विकास करू सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारच असतील, असे स्पष्ट संकेत बुधवारी दिले. तसेच कोरोनाच्या काळात बिहारमधील विधानसभा आणि देशभरातील पोटनिवडणुका यशस्वीपणे पार पडल्याबद्दल निवडणूक आयोगाची प्रशंसा करताना मोदींनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळाबद्दल अमेरिकेला अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या. लोकशाहीप्रती भारतीयांची जी आस्था आहे, त्याला जगात कुठेच तोड नाही. निवडणुकीत जय-पराभव हा आपापल्याला जागेवर आहे. पण निवडणुकीची प्रक्रिया प्रत्येक भारतीयांसाठी गौरवाचा विषय आहे. निवडणुकीला यशस्वीपणे राबवल्याबद्दल मी निवडणूक आयोगाचे धन्यवाद मानतो, असेही ते म्हणाले.

बिहार विधानसभा निवडणूक आणि देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयाचे सेलिब्रेशन करण्यासाठी भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधताना मोदी म्हणाले की, निवडणूक काही विभागात झाली असेल, पण काल सकाळपासून रात्री उशिरापर्यंत संपूर्ण देशाचे लक्ष टीव्ही, ट्विटरवर होते. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जनतेचे लक्ष होते. लोकशाहीप्रति भारतीयांची जी आस्था आहे, त्याचं उदाहरण संपूर्ण भारतात कुठेही नाही. निकालात हार-जीत आपल्या जागेवर आहेत. पण निवडणुकीची प्रक्रिया प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा विषय आहे. त्यामुळे मी प्रत्येक भारतीयाचे अभिनंदन करतो. कोटी कोटी देशवासीयाचं धन्यवाद मानतो. निवडणुकीला शांततापूर्ण आणि यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल निवडणूक आयोग, देशाचं सुरक्षा दल आणि स्थानिक प्रशासनाचेही अभिनंदन करतो, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

- Advertisement -

काही गोष्टी तर आम्ही विसरलो आहोत. काही वर्षांपूर्वी निवडणूक व्हायची, तेव्हा दुसर्‍या दिवशी किती बुथ लुटले गेले, अशा प्रकारच्या बातम्या यायच्या. मात्र, आज मतदानाचा टप्पा किती वाढला, किती महिलांचे मतदान वाढले, याबाबत बातम्या असतात. पूर्वी बिहारच्या निवडणुकीत किती लोक मारले गेले, किती बुथ लुटले गेले, अशाच बातम्या असायचा. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीतही शांततापूर्ण मतदान झाले. कोरोना संकटात मतदानासाठी लोक घराबाहेर पडले, हीच तर खरी ताकद आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केले आहे.

कोरोना संकटात निवडणूक करणे सोपे नव्हते; पण आपल्या व्यवस्था इतक्या मजबूत आहेत की, संकट काळात निवडणूक घेऊन भारताची ताकद दाखवली. या निवडणुकीत भाजप आणि एनडीएला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कार्यकर्त्यांचे जितके अभिनंदन करावे तितके कमी आहे. बिहारमधील विजय हा जे. पी. नड्डा यांची कुशलता आणि प्रभावी रणनितीचाही परिणाम आहे. नड्डाजी तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असेही मोदींनी सांगितले आहे.

- Advertisement -

हत्या करून मते मिळत नाही
देशात अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. हत्या करुन मते मिळत नाहीत. आपण लोकशाहीसाठी समर्पित आहोत. भाजपतील कार्यकर्ते आपल्या उद्देशापासून तसूभरही डगमगणार नाहीत. निवडणुकीतले यश भाजपला ताकद देत राहील. देशाला मी विश्वास देतो की, आम्ही आमचे काम निष्ठेने करत राहू, असे मोदी म्हणाले.

विकासाकडे दुर्लक्ष केल्याने डिपॉझिट जप्त
देशाचा विकास, राज्यांचा विकास हे आजचे सर्वात मोठे आव्हान आहे आणि विकासाचा हाच मुद्दा येणार्‍या निवडणुकीचा मुख्य मुद्दा राहणार आहे. हे बिहारच्या निवडणुकीतूनही सिद्ध झाले आहे, असे सांगतानाच या लोकांना हा मुद्दा लक्षात येत नाहीये, म्हणूनच त्यांची वारंवार अनामत रक्कम जप्त होत आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता केली.

(अंतिम निकाल)

२०२० बिहार विधानसभा निवडणूक
एकूण जागा -२४३
बहुमतासाठी आवश्यक जागा -१२२

महागठबंधन -११०

राष्ट्रीय जनता दल -७५
काँग्रेस -१९
डावे पक्ष -१६

राष्ट्रीय लोकशाही आघाडी -१२५

भाजप – ७४
जनता दल (संयुक्त) -४३
हिंदुस्थानी अवाम मोर्चा -४
विकशील इन्सान पार्टी -४

इतर -७

एमआयएम -५
बहुजन समाज पक्ष -१
लोक जनशक्ती पक्ष -१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -