घरताज्या घडामोडीठाकरे सरकार चार वर्षे टिकणार नाही

ठाकरे सरकार चार वर्षे टिकणार नाही

Subscribe

बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएची सत्ता आली आहे व त्यात भाजपला चांगले यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारविषयी महत्त्वाचे विधान केले. ‘महाराष्ट्रातील सरकार चार वर्षे टिकणार नाही’, असा दावा त्यांनी केला.

सरकार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही. भाजप हा घटना मानणारा पक्ष आहे आणि घटनाविरोधी कोणतेही काम आमच्याकडून होणार नाही. यापुढेही राज्यात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करत राहणार आहोत, असे पाटील म्हणाले. महाराष्ट्रातील सरकार चार वर्षे टिकणार नाही. मात्र, भविष्यात काय होईल, हे गुलदस्त्यात आहे, असे सूचक वक्तव्यही पाटील यांनी केले. महाराष्ट्रामध्ये पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपच्या बाजूने कल दिसेल. विद्यार्थी, कामगार, शिक्षक, महिला, शेतकरी अशा एक हजार लोकांचे सर्वेक्षण केल्यास त्यापैकी ९०० लोक भाजपच्या बाजूने मत मांडतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रामध्ये सध्या कोणताही घटक सुखी नाही. त्यामुळे लवकरात लवकर हे सरकार बदलले पाहिजे, अशी लोकांची इच्छा असल्याचा दावाही त्यांनी केला.

- Advertisement -

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर मतप्रदर्शन केले. भारतीय जनता पक्षाचे देशात १८ राज्यांमध्ये सरकार आहे आणि विजयाची ही परंपरा कायम राहणार आहे, असे ते म्हणाले. बिहारमध्ये झालेल्या निकालाचा परिणाम हा आगामी पश्चिम बंगाल आणि अन्य राज्यांमध्ये होणार्‍या निवडणुकांमध्ये होईल. भाजपाला त्याचा फायदा झालेला दिसेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. बिहारच्या निकालानंतर देशभरामध्ये उत्साहाची लाट आली आहे. त्याचा परिणाम हा राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांवरही होणार आहे. या मतदारसंघांचे निकाल कायम भाजपाच्या बाजूने राहिले आहेत आणि आताही राहतील, असे पाटील म्हणाले.

बिहारचे निकाल लागल्यानंतर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनबाबत (ईव्हीएम) शंका उपस्थित करण्यात आली. मात्र, पंजाबमध्ये काँग्रेसच्या बाजूने निकाल लागल्यानंतर ईव्हीएमबाबत शंका घेतली गेली नाही. बिहारमध्ये विरोधकांना ११० जागा मिळाल्या आहेत. मग तेथे ईव्हीएम सदोष होते, असे म्हणायचे का?, असा सवाल पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -