कोरोनामुळे देशात २५ मार्च पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. यादरम्यान अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. तर अनेक कर्मचारी विनावेतन काम करत आहेत. दरम्यान २५ मार्च ते ३१ ऑगस्ट या पाच महिन्यांच्या काळाता देशातील नागरिकांनी भविष्य निर्वाह निधीमधून तब्बल ३९ हजार ४०२ रुपये काढून घेतले असल्याचे समोर आले आहे. कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी लेखी उत्तरात लोकसभेत ही माहिती दिली. विशेष म्हणजे पीएफमधून पैसे काढण्यात सर्वात पहिला क्रमांक महाराष्ट्राचा लागला आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी ७ हजार ८३७ कोटी रुपये काढले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात उपजीविकेसाठी अनेकांना आर्थिक संघर्ष करावा लागला होता. याकाळात नागरिकांनी आपल्या वृद्धापकाळासाठी जमवलेली पीएफमधील रक्कम काढून घेतली. कामगार मंत्री यांनी याबद्दलची सविस्तर माहितीच लोकसभेत दिली. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक पैसे काढणाऱ्या राज्यांमध्ये कर्नाटक राज्याचा क्रमांक लागतो. कर्नाटक राज्यात ५ हजार ७४३ कोटी रुपये काढण्यात आले आहेत. तर तामिळनाडू (पाँडेचरी) राज्यातून ४ हजार ९८४ कोटी रुपये काढण्यात आले आहेत. तर दिल्ली मधून लॉकडाऊनच्या काळात २ हजार ९४० कोटी रुपये काढण्यात आलेले आहेत.
कामगार मंत्री लोकसभेत माहिती देताना म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात देशातील कामगारांना अवघड परिस्थितीचा सामना करावा लागला होता. कोरोना महामारीचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. याच्यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKY) आणि आत्मनिर्भर भारत सारख्या उपाययोजना राबविल्या आहेत.