कलकत्त्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून हरिदेवपूर परिसरातल्या एका बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी तब्बल १४ नवजात अर्भकांचे मृतदेह प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे या परिसरात खळबळ माजली असून हे १४ मृतदेह नक्की आले कुठून? असा प्रश्न स्थानिकांसोबतच पोलीस प्रशासनालाही पडला आहे. हा प्रकार अंधश्रद्धेचा किंवा नरबळीचा आहे का? या दिशेनेही स्थानिक पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान, हे मृतदेह नक्की आले कुठून? यासंदर्भात आसपासच्या रुग्णालयांमध्ये चौकशी सुरू करण्यात आली आहे. स्थानिकांकडून मात्र हा नरबळीचाच प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
रविवारी हरिदेवपूर परिसरात स्वच्छतेचं काम सुरू असताना हे १४ मृतदेह आढळून आले. हे सर्व मृतदेह प्लॅस्टिकच्या बॅगेत गुंडाळण्यात आले होते. स्थानिक पोलिसांना यामागे गर्भपात करणाऱ्या टोळक्याचं रॅकेट असल्याचा संशय आहे. ‘हे मृतदेह नक्की कुठून आले? याविषयी आम्हाला कोणतीही माहिती मिळाली नसून सदर जागा मोकळीच असल्यामुळे गुन्हेगारांनी त्याचा फायदा घेऊन इथे हे सर्व मृतदेह पुरले असावेत’, अशी माहिती स्थानिक पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.