कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने देशभरात काही उपक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालयांसह उच्च शिक्षण संस्थांवरही यामध्ये बंदी आहे. या कारणामुळेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातूनच शिकविले जात आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून अवलंबलेल्या या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढू लागल्या असल्याचे समोर आले आहे. यामुळेच ऑनलाइन वर्गाच्या दबावामुळे तामिळनाडूमध्ये एका महिन्यात तीन मुलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
असा घडला प्रकार
तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यातील ताज्या घटनेनुसार ऑनलाइन वर्गातील दबावामुळे दहावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून शिकवण्यात येणारे शिक्षण समजत नसल्याने विद्यार्थीनीला तणाव आल्याचे सांगितले जात आहे. तर जे शिकवले जायचे ते समजत नसल्यामुळे, ती नैराश्यात गेली असल्याचे समजते.
दरम्यान या प्रकारामुळे परीक्षेत कमी गुणांची भीती तिला होती. या सर्व कारणांमुळे त्रस्त होऊन १५ वर्षीय मुलीने मंगळवारी आपले आयुष्य संपवल्याचा दुर्दैवी प्रकार तमिळनाडूमध्ये घडल्याचे दिसले.