दिल्लीतील रामलीला मैदानावर सध्या भाजप कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते आहे. आज रविवारपासून पुढील तीन आठवड्यापर्यंत रामलीला मैदानावर भाजपाकडून काही मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याची सुरुवात म्हणून दलित समाजाला आकर्षित करण्यााठी भाजपने ‘भीम महासंगम’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. खास या कार्यक्रमासाठी ५००० किलो खिचडी तयार केली जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामजिक समानतेचा संदेश देण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या नेतृत्वाखाली ही ५००० किलोची खिचडी तयार केली जात आहे. विशेष म्हणजे या हजारो किलोंच्या खिचडीसाठी अनुसूचित जातींमधील ३ लाख घरांमधून डाळ आणि तांदूळ आणण्यात आले आहेत. भाजपने आयोजित केलेल्या या खास रॅलीत एकाच वेळी सर्वात जास्त खिचडी शिजवण्याचा विश्वविक्रम केला जाणार आहे. संजीव कपूर यांच्या नावावर ९१८ किलो तांदळाच्या खिचडीचा रेकॉर्ड आहे. आज भाजप हा रेकॉर्ड मोडणार असल्याचं चित्र दिसत आहे.
5000 kg ‘Khichdi’ being cooked for BJP’s ‘Bhim Mahasangam Vijay Sankalp’ rally in Delhi’s Ram Leela Maidan later today. The rice and lentils have been collected from Dalit households. pic.twitter.com/PQloYm9wAy
— ANI (@ANI) January 6, 2019
दिल्लीच्या रामलीला मैदानावर भाजपने आयोजित केलेल्या या रॅलीमध्ये नागपूरचे शेफ विष्णू मनोहर आणि त्यांचे सहकारी सहभागी होणार आहेत. विष्णू मनोहर यांच्या अधिपत्याखाली त्यांची टीम खिचडी शिजवण्याचं काम करेल. या रॅलीमध्ये दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी, महासचिव रामलाल, थावरचंद गहलोत यांच्यासह अन्य नेते सहभागी होणार आहेत. याशिवाय रॅलीमध्ये साधारण ५० हजार लोकं सहभागी होणार असल्याची शक्यता आयोजकांकडून वर्तवली जात आहे.