देशातील कोरोना व्हायरसचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे सात हजार ९६४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाख ७३ हजार ७६३वर पोहोचली आहे. तसंच एकूण चार हजार ९७१ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती दिली आहे.
Highest spike of 7,964 new #COVID19 cases and 265 deaths in the last 24 hours in India. Total number of cases in the country now at 1,73,763 including 86422 active cases, 82370 cured/discharged/migrated and 4971 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/990tyBfGPe
— ANI (@ANI) May 30, 2020
सध्या ८६ हजार ४२२ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत ८२ हजार ३७० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जगात सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत भारत आता नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर मृतांच्या आणि बाधितांच्या आकड्यात भारताने चीनला मागे टाकले आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य महाराष्ट्र असून त्यापाठोपाठ तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेश आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा ६२ हजारांहून अधिक आहे. तसंच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे ३६ हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावाच्या प्रार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने देशाला सात राज्यात लॉकडाऊन शिथिल न करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, चंदीगढ आणि बिहार यासारख्या राज्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यास जागतिक आरोग्य संघटनेने मनाई केली आहे. देशातील ही राज्य कोरोनाने जास्त प्रभावित आहेत. या राज्यांत सूट देणे म्हणजे आपल्या घरी कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनचे पालन करणे फार महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा – Coronavirus: अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेशी तोडले संबंध!