लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सपा आणि बसपा या दोन्ही पक्षांनी भाजपची झोप उडवून टाकली आहे. आगामी लोकसभा निवडणुक एकत्र लढवण्याचा निर्णय सपा आणि बसपा या पक्षाने घेतला आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी दिल्लीमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली आहे. उत्तरप्रदेशमध्ये दोन्ही पक्षांनी आघाडी केल्यामुळे भाजपच्या चिंतेत वाढ झाली आहे. दोन्ही पक्ष ३८-३८ जागांवर निवडणुक लढवणार आहेत. सपा- बसपाने दोन सीट मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. यावेळी मायावतींनी सांगितले की, आम्ही काँग्रेससोबत आघाडी करणार नाही. मात्र अमेठी आणि रायबरेली काँग्रेससाठी सोडत आहोत. अमेठीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि रायबरेलीमध्ये सोनिया गांधी अध्यक्षा आहेत.
BSP Chief Mayawati: We(BSP-SP) have decided to contest upcoming Lok Sabha elections together, this will lead to a new political revolution in the country. pic.twitter.com/eZcEf5Fq0f
— ANI (@ANI) January 12, 2019
काँग्रेसला आघाडीत नाही
या पत्रकार परिषदेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांची झोप उडाली असेल, असे मायावती यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीआधी झालेली ही आघाडी राजकारणात नक्की क्रांती घडवेल, असा विश्वास मायावती यांनी व्यक्त केला. दरम्यान, काँग्रेसच्या मागील कामांना पाहता त्यांना आघाडीमध्ये घेतले नसल्याचे मायावती यांनी सांगितले. काँग्रेसला बोफर्सने हारवले होते आणि भाजपला राफेल ने हारवले आहे. काँग्रेसच्या काळामध्ये देशामध्ये आणीबाणी लागू केली गेली होती. तर भाजपच्या काळात देशामध्ये अघोषित आणीबाणी असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. काँग्रेससोबत आमचा मागचा अनुभव चांगला नाही. त्याचा फायदा आम्हाला मतदानात मिळणार नाही. अशामध्ये काँग्रेसला आमचा फायदा मिळतो मात्र आम्हाला फायदा होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
#WATCH: BSP Chief Mayawati and Samajwadi Party Chief Akhilesh Yadav address a joint press briefing in Lucknow https://t.co/tVzUqZAclX
— ANI (@ANI) January 12, 2019
जनतेच्या हिताचा निर्णय
मायावती यांनी पुढे असे सांगितले की, माझ्यासाठी गेस्ट हाऊस प्रकरणापेक्षा देश महत्वाचा आहे. १९९३ साली मुलायम सिंह यादव आणि काशीराम यांनी एकत्र येत निवडणुक लवढवली होती. सगळ्यांना माहित आहे की काय झाले ते. काही गंभीर मुद्द्यांमुळे त्यांची युती टिकू शकली नाही. मात्र आता आम्ही एकत्र आलो आहोत. देशाचे हित आणि जनतेच्या हिताला मी गेस्ट हाऊस प्रकरणापेक्षा जास्त महत्व देते. ही आंबेडकर आणि लोहिया यांना मानणाऱ्यांची युती असून हे जातिवादी आणि सांप्रदायिक भाजपपेक्षा वेगळे असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे.
भाजपकडून धर्माच्या नावावर राजकारण
दरम्यान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही भाजपावर सडकून टीका केली. देशात सध्या अराजकतेची परिस्थिती आहे. राज्यातील गरिबी वाढली आहे. भाजपाकडून धर्माच्या नावानं राजकारण केलं जात असल्याची टीका अखिलेश यादव यांनी केली आहे. मायावतींवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांवर त्यांनी शरसंधान साधलं. ‘भाजपा नेते मायावतींवर अशोभनीय शब्दांमध्ये टीका करतात. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. आता मायावतींचा सन्मान हा माझा सन्मान आहे आणि त्यांचा अपमान हा माझा अपमान आहे,’ असं अखिलेश यांनी म्हटलं.