“पाकव्याप्त काश्मीरच्या बाबतीत सरकारने निर्णय घ्यावा, आपले सैन्य दल तयार आहे”, असे वक्तव्य भारतीय सैन्य दलाचे प्रमुख बिपिन रावत यांनी अमेठीमधील एका कार्यक्रमात केले आहे. काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यात आल्यापासून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर जम्मू-काश्मीरचा मुद्दा घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांना सातत्याने अपयश येत असल्याने त्यांच्याकडून सतत युद्धाच्या धमक्या दिल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले होते की, पाकव्याप्त काश्मीरबाबत आता कोणतीही चर्चा पाकिस्तानसोबत होणार नाही. त्यानंतर आज रावत यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.
#WATCH Army Chief, General Bipin Rawat on Union Minister Jitendra Singh's statement, “Next agenda is retrieving PoK & making it a part of India”: Govt takes action in such matters. Institutions of the country will work as per the orders of the govt. Army is always ready. pic.twitter.com/RUS0eHhBXB
— ANI (@ANI) September 12, 2019
लष्कर प्रमुख रावत यांनी केलेल्या वक्तव्यानुसार आता भारत आणखी आक्रमक होऊन आपली रणनीती आखत असल्याचे दिसून येते. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दोन दिवसांपूर्वीच पाकव्याप्त काश्मीरला भारताशी जोडण्याचा पुढचा अजेंडा असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यावरच प्रतिक्रिया देताना रावत यांनी सेना सज्ज असल्याचे म्हटले आहे.
राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरला भारताशी जोडणे ही केवळ आमच्या पार्टीची प्राथमिकता नाही. तर १९९४ साली तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी पाकव्याप्त काश्मीरवर हक्क सांगणारा प्रस्ताव मंजूर केला होता. पाकिस्तानने गेल्या काही दशकांपासून भारत सरकारला काश्मीरमधील दहशतवादामध्ये गुंतवून ठेवले होते. ३७० हटविल्यानंतर आता भारताने पाकव्याप्त काश्मीरवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.