केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना रविवारी अखेरचा निरोप देण्यात आला. दिल्लीतील यमुना तिरावरील निगमबोध घाट येथे जेटली यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा रोहन यांनी अरुण जेटली यांना मुखाग्नी दिला.
या प्रसंगी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंधया, कपिल सिब्बल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आदी नेते उपस्थित होते.
अरुण जेटली यांच्या अंत्ययात्रेला भाजपाच्या मुख्यालयातून रविवारी दुपारी 1 वाजता सुरूवात झाली. निगमबोध घाटावर तीन वाजता त्यांचे पार्थिव आणण्यात आल
यावेळी सर्व संस्कार पार पडल्यानंतर त्यांचा मुलगा रोहन यांनी अरुण जेटली यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. भाजपा मुख्यालयात अरुण जेटली यांचे भाजपा आणि इतर राजकीय पक्षांतील नेते, कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. जेटली यांना ९ ऑगस्ट रोजी ‘एम्स’ हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यांनी शनिवारी दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या युगातून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपच्या वाटचालीत सहज सहभागी होणार्या भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी जेटली एक होते.
अरुण जेटली हे अजातशत्रू म्हणून ओळखले जात होते. सर्व पक्षांमध्ये तसेच माध्यमांमध्येही त्यांचे मित्र होते. म्हणूनच त्यांच्या निधनाची माहिती मिळताच सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पेशाने वकील असलेल्या जेटली यांनी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकालात अर्थमंत्री आणि संरक्षणमंत्रीपद सांभाळले होते. पंतपधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय राजकारणात आले, तेव्हा दिल्लीतील राजकारणाविषयी जेटली यांनी त्यांना माहिती दिली. त्याचा उपयोग नरेंद्र मोदी यांना झाला. तसेच मोदी सरकार असो किंवा भाजपाच्या पक्षांतर्गत कोणत्याही अडचणी आल्या, तरी अरुण जेटली हे संकटमोचक म्हणून उभे राहिले.