अयोध्येतील वादग्रस्त जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी ऐतिहासिक असा निकाल देत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पाडला. मात्र, आता पुन्हा हा वाद सर्वोच्च न्यायालयासमोर उभा ठाकणार आहे. ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर या निकालावर फेरविचार याचिका करणार नसल्याचं मुस्लीम पक्षाकडून सांगण्यात आलं होतं मात्र, आता या प्रकरणी फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचं अखिल भारतीय मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने स्पष्ट केलं आहे. ‘अयोध्या प्रकरणात न्याय्य निकाल झाला नसून त्याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात निकालाला आव्हान देणार आहोत’, असं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Syed Qasim Rasool Ilyas, All India Muslim Personal Law Board (AIMPLB): The Board has decided to file a review petition regarding Supreme Court's verdict on Ayodhya case. pic.twitter.com/fV6M2Lifhc
— ANI UP (@ANINewsUP) November 17, 2019
सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने ९ नोव्हेंबर रोजी अयोध्या प्रकरणाचा निकाल दिला होता. या निकालानुसार वादग्रस्त जागी राममंदिर बांधण्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच, मुस्लीम पक्षकारांना अयोध्येमध्येच मोक्याच्या ठिकाणी मशीद उभारणी करण्यासाठी ५ एकर जमीन देण्याचे निर्देश देखील न्यायालयाने दिले. दरम्यान, यावेळी सुन्नी वक्फ बोर्डाचा वादग्रस्त जागेवरचा दावा न्यायालयाने अमान्य केला.
‘याचिका १०० टक्के फेटाळली जाणार’
दरम्यान, फेरविचार याचिका जरी न्यायालयात दाखल होणार असली, तरी ही याचिका १०० टक्के फेटाळली जाणार असल्याचं मुस्लीम पक्षकार मान्य करत आहेत. जमैत उलेमा ए हिंदचे मौलाना अर्शद मदानी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्हाला आधीपासून माहिती आहे की आमची याचिका फेटाळली जाणार आहे. पण आम्हाला याचिका दाखल करावी लागणार. तो आमचा अधिकार आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Maulana Arshad Madani, Jamiat Ulema-e-Hind on AIMPLB meeting on Supreme Court's Ayodhya Verdict: Despite the fact that we already know that our review petition will be dismissed 100%, we must file a review petition. It is our right. pic.twitter.com/VvvnkqEtnX
— ANI UP (@ANINewsUP) November 17, 2019