भारतीय संसद आणि पुलवामा येथील हल्ल्याला जबाबदार असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात भारताला यश प्राप्त झाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने आज मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. भारताचे राजदूत आणि संयुक्त राष्ट्र संघाचे कायमस्वरुपी प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन यांनी आपल्या ट्विटरवर याची माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर अझहरची संपत्ती गोठवण्यात येणार आहे, तसेच पाकिस्तान सोडून इतर कोणत्याही देशात त्याला प्रवास करता येणार नाही.
Big,small, all join together.
Masood Azhar designated as a terrorist in @UN Sanctions list
Grateful to all for their support. ??#Zerotolerance4Terrorism
— Syed Akbaruddin (@AkbaruddinIndia) May 1, 2019
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताने अनेकदा मसदू अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे, असा प्रस्ताव मांडला होता. मात्र चीनने या प्रस्तावाला नेहमीच आडकाठी लावली होती. फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर भारताने पुन्हा एकदा मसदू अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे, या मागणीसाठी जोर लावला. भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वीरित्या दबाव निर्माण केल्यामुळे यावेळी भारताला जगभरातील देशांचा पाठिंबा मिळाल्यामुळे पाकिस्तान आणि चीनला नमते घ्यावे लागले.
एप्रिल महिन्यात भारताचे परराष्ट्र खात्याचे सचिव विजय गोखले यांनी चीनचे परराष्ट्र खात्याचे मंत्री वांग की आणि बीजिंगमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबतीत बातचीत केली होती. त्याआधी मार्च महिन्यात फ्रान्सने मसूद अझहरला काळ्या यादीत टाकण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. मात्र त्याला चीनने त्यावेळी विरोध करत याबाबतीत आम्हाला अधिक अभ्यास करायचा असल्याचे कारण पुढे केले होते. अझहरला काळ्या यादीत टाकण्यापासून रोखण्याची ही चीनची चौथी वेळ होती.