बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार? मंगळवारी सकाळी सुरु झालेल्या मतमोजणीपासून उपस्थित झालेल्या प्रश्नाचे उत्तर बुधवारी पहाटे मिळाले आहे. बिहारमध्ये NDA ला म्हणजेच भाजप आणि नितीश कुमार यांच्या जोडीला १२५ जागांवर विजय मिळाला आहे. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वात लढलेल्या महागठबंधनला ११० जागा मिळाल्या आहेत. बिहारमध्ये NDA ला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नितीश कुमार सातव्यांदा मुख्यंत्रीपदाची शपथ घेतील.
बिहारमधील सर्व २४३ जागांचे निकाल हाती आले असून NDA ने १२५ जागा मिळवल्या आहेत. या १२५ जागांमध्ये भाजपने ७४ जागा, जदयूने ४३ जागा तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे महागठबंधनला ११० जागा मिळवल्या आहेत. यामध्ये सर्वात चांगली कामगिरी केली आहे ती राजदने. तेजस्वी यादव यांच्या राजद पक्षाने ७५ जागा मिळवत बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महाआघाडीतल्या काँग्रेसला १९ जागांवर तर डाव्यांना १६ जागांवर विजय मिळाला आहे. दुसरीकडे बिहारमध्ये एमआयएमला पाच जागा तर बसपा, लोजप आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून एनडीएला बहुमत मिळाले आहे आणि नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
#BiharElections: Results of all 243 assembly constituencies declared.
NDA wins 125 seats (BJP 74, JDU 43, VIP 4, HAM 4)
Mahagathbandhan wins 110 seats (RJD 75, Congress 19, Left 16)
AIMIM wins 5, BSP wins 1, LJP wins 1 & Independent wins 1 pic.twitter.com/hzIJ1SUmbu
— ANI (@ANI) November 10, 2020
नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची सातव्यांदा शपथ घेणार
- नितीश कुमार सर्वप्रथम ३ मार्च २००० रोजी मुख्यमंत्री झाले पण बहुमताअभावी त्यांचे सरकार सात दिवसात पडले.
- २४ नोव्हेंबर २००५ रोजी ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.
- २६ नोव्हेंबर २०१० रोजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.
- २०१४ मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. परंतु २२ फेब्रुवारी २०१५ रोजी चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.
- २० नोव्हेंबर २०१५ रोजी पाचव्या वेळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
- आरजेडी सोडल्यानंतर भाजपसोबत यूती केली आणि २७ जुलै २०१७ रोजी सहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.