काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींविरोधात भाजपनं आता निवडणूक आयोगामध्ये धाव घेतली आहे. हैद्राबादमधील एका वृत्तपत्राला राहुल गांधी यांनी दिलेली मुलाखत ही पेड होती. या पेड मुलाखतीतून राहुल गांधी यांनी मतदारांना काँग्रेसकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपनं केला आहे. या मुलाखतीविरोधात आता भाजपनं निवडणूक आयोगाकडे धाव घेत राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली आहे. भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी राहुल गांधींविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. राहुल गांधी यांनी ६ डिसेंबर रोजी हैद्राबादमधील एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. ही मुलाखत पेड होती. त्यातून मतदारांना काँग्रेसकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केल्याची तक्रार मख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे. या मुलाखतीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वेक्षणचा हवाला देऊन पाचही राज्यात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा दावा केला होता. ही मुलाखत पेड न्यूज श्रेणीत येते. मतदानाच्या ४८ तास अगोजर कोणीही प्रचार करू शकत नाही. तसेच मुलाखत देखील देऊ शकत नाही. पण, राहुल गांधी यांनी जाणतेपणे मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे.