देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये वाढ होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अनेक ठिकाणी असे दावे देखील केले जात होते की रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, आता थेट केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गाबा यांनीच यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ‘अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत याचं मला आश्चर्य वाटत आहे. देशात लॉकडाऊनचा २१ दिवसांचा कालावधी वाढवण्याचा केंद्र सरकारचा सध्या कोणताही विचार नाही’, असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे १४ एप्रिलनंतर देशातलं लॉकडाऊन संपणार असल्याचं सध्या तरी स्पष्ट झालं आहे. मात्र, महाराष्ट्रातला लॉकडाऊन केंद्रसरकारच्या घोषणेच्याही आधी जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही केंद्रासोबतच लॉकडाऊन संपेल का? असा प्रश्न मात्र कायम आहे.
I’m surprised to see such reports, there is no such plan of extending the lockdown: Cabinet Secretary Rajiv Gauba on reports of extending #CoronavirusLockdown (file pic) pic.twitter.com/xYuoZkgM5e
— ANI (@ANI) March 30, 2020
दरम्यान, एकीकडे भारत सरकारने देशात लागू केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिलनंतर वाढवण्याचा विचार नसल्याचं स्पष्ट केलं असताना दुसरीकडे जगातली महासत्ता असलेल्या अमेरिकेने मात्र लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवला आहे. जगभरातलं कोरोनाचं संकट आणि अमेरिकेत सातत्याने वाढ होत जाणारे कोरोनाचे रुग्ण या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज ही घोषणा केली आहे.