देशाच्या केंद्रीय महिला आयोगावर आणि विविध राज्यांत असलेल्या महिला आयोगांवर महिलांच्या सुरक्षा आणि त्यांच्या अधिकारांबाबत काम करण्याची जबाबदारी असते. मात्र, महिला आयोगाच्या सदस्यांकडूनच महिलांच्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण करणारं विधान होत असेल, तर ते देशातल्या अंतर्गत सुरक्षित वातावरणावर मोठं प्रश्नचिन्ह असतं. त्यामुळेच उत्तर प्रदेशच्या बदायूँमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावर केंद्रीय महिला आयोगाच्या एका महिला सदस्याने केलेलं वादग्रस्त वक्तव्य आता चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलं आहे. ‘पीडिता जर संध्याकाळी उशिरा घराबाहेर पडली नसती, तर तिचा जीव वाचला असता’, असं वक्तव्य केंद्रीय महिला आयोगाच्या एक सदस्य चंद्रमुखी देवी यांनी केलं आहे.
उत्तर प्रदेशच्या बदायूँमध्ये ३ जानेवारी रोजी एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. २०१२मध्ये दिल्लीमध्ये घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणाप्रमाणेच या प्रकरणात देखील पीडितेवर अमानुष अत्याचार करण्यात आले होते. पीडितेचा पाय देखील मोडण्यात आला होता. या प्रकरणाचे तीव्र पडसाद उत्तर प्रदेशमध्ये आणि देशभरात उमटत आहेत. मात्र, त्यावर महिला आयोगाच्या सदस्यानंच वादग्रस्त विधान केल्यामुळे त्याची चर्चा होऊ लागली आहे.
काय म्हणाल्या चंद्रमुखी देवी?
या घटनेविषयी माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता चंद्रमुखी देवी म्हणाल्या, ‘पीडित महिला जर संध्याकाळी उशिरा घराबाहेर पडली नसती, किंवा तिच्या कुटुंबीयांबरोबर बाहेर गेली असती, तर आज ती वाचली असती’. त्यांच्या या वक्तव्यावर वाद होऊ लागल्यानंतर केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी ‘देशात कधीही कुठेही फिरण्याचं महिलांना स्वातंत्र्य आहे’, असं स्पष्टीकरण देऊन सारवासारव केली आहे.
Women should not go out at odd hours, what ever may be the reason. I think, (If that) woman (from Badun) had not stepped out in the evening or if she had been accompanied by someone from her family, she wouldn't have been r@ped : Chandramukhi Devi, NCW member and former BJP MLA pic.twitter.com/H0WRfXpptR
— Ravi Nair (@t_d_h_nair) January 7, 2021