नागरिकत्व दुरुस्ती विधेयकवार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. रात्री उशिरा राष्ट्रपतींनी या विधेयकाला मंजुरी दिल्यामुळे आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झालेले आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधयेकावरुन ईशान्य भारतात रणकंदन माजलेले आहे. आसाम राज्यात विधेयकाच्या विरोधात उग्र आंदोलन सुरु असून जाळपोळीच्याही घटना घडत आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार आता भारताच्या शेजारी असलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशमधून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिस्ती धर्माच्या लोकांना भारतात घुसखोर समजले जाणार नाही. या कायद्यानुसार आता त्यांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
President Ram Nath Kovind gives his assent to The Citizenship (Amendment) Act, 2019. pic.twitter.com/RvqZgBjhis
— ANI (@ANI) December 12, 2019
ईशान्य भारत अशांत का?
नागरिकत्व दुरुस्ती विधयेक लोकसभेत मांडल्यापासून ईशान्य भारतात आक्रोष व्यक्त केला जात आहे. ईशान्य भारत सध्या परकीय घुसखोरीमुळे पोखरलेला आहे, अशी तेथील स्थानिकांची भावना झालेली आहे. त्यातच आता नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे परकीय नागरिकांना अधिकृतपणे भारताचे नागरिकत्व मिळणार असल्यामुळे ईशान्य भारतातील आसाम, त्रिपुरा येथे हिंसक आंदोलने सुरु झाली आहेत. ही आंदोलने शांत करण्यासाठी केंद्र सरकारने लष्काराची मदत घेतली आहे. आसाममध्ये संचारबंदी, इंटरनेटबंदी लागू करण्यात आली आहे.