यवतमाळ जिल्ह्यामध्ये दहशत पसरवणाऱ्या आणि १३ जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक अवनी वाघिणीला गोळ्या झाडून ठार करण्यात आले. या घटनेनंतर त्याचे पडसाद उमटू लागले आहे. याप्रकरणी विरोधी पक्षांसह सर्वच स्तरावर भाजपवर टीका केली जात आहे. मेनका गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे त्यांच्यानंतर आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील भाजपवर सडकून टीका केली आहे. ट्विट करुन राहूल गांधी यांनी अवनी वाघिणीला ठार केल्याच्या प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
The greatness of a nation can be judged by the way its animals are treated.
Mahatma Gandhi#Avni
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 5, 2018
राहूल गांधींची भाजपवर टीका
महात्मा गांधी यांचं एक प्रसिद्ध वचन ट्विट करत राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे.. ‘एखाद्या देशात तिथल्या प्राण्याला दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरुन त्या देशाची महानता ठरते – महात्मा गांधी #Avni’, असं राहुल गांधी यांनी ट्वीट केलं आहे.
सामनातून भाजपवर टीका
दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनवीला ठार केल्याप्रकरणी सामनाच्या संपादकीयामधून निशाणा साधला आहे. राज्यामध्ये दुष्काळ, उपासमार, कुपोषण, सरकारी अनास्था, शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण यामुळे राज्यात माणसे मरत आहेत. स्वतःचे जीवन संपवून घेत आहेत. मात्र त्यासाठी कोणी सरकारी व्यवस्थेला ‘नर’भक्षक ठरवत नाही. वन्य प्राण्यांना मात्र ‘नरभक्षक’ ठरवून त्यांना शिक्षा दिली जाते. अवनी, तू याच मानवी स्वार्थाची बळी ठरलीस. ज्या राज्यात माणसेही नीट जगू शकत नाहीत त्या राज्यात तुझ्यासारख्या वन्य जीवांचे काय? अवनी, आम्हाला माफ कर. तुला भेकडासारखे मारले. रात्रीच्या अंधारात उंदरांनाही वाघाचे बळ येते, अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
I am deeply saddened by the way tigress Avni has been brutally murdered in #Yavatmal, #Maharashtra. #Justice4TigressAvni https://t.co/hX6wuf62Ec
— Maneka Gandhi (@Manekagandhibjp) November 4, 2018
मनेका गांधींची भाजपवर टीका
नरभक्षक वाघिण अवनीची हत्या झाल्या प्रकरणी केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री मेनका गांधी फडणवीस सरकारवर चांगल्याच भडकल्या आहेत. त्यांनी ट्विटरवर या घटनेचा निषेध व्यक्त केला. वन्यजीवप्रेमी मेनका गांधी यांनी काल ट्विटवर सांगितले की, “अवनीची ज्याप्रकारे हत्या केली गेली त्यावरुन मला अतीव दुःख झाले आहे.” #Justice4TigressAvni हा हॅशटॅग वापरून मेनका गांधी यांनी दहा ट्विट करत फडणवीस सरकारवर टीका केली आहे.