जगभरासह देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या केसेस दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासन धडपड करताना दिसतेय. तर भारतात कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन झाले आहे, असा दावा भारतातील एका विषाणू शास्त्रज्ञाने केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
कम्युनिटी ट्रान्समिशन कोरोनाचा तिसरा टप्पा
कोरोना व्हायरसचा कम्युनिटी ट्रान्समिशन हा तिसरा भयंकर असा टप्पा असून आतापर्यंत परदेशातून आलेल्या किंवा त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांना कोरोना व्हायरसचं निदान होत होतं. मात्र तिसऱ्या टप्प्यात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीने परदेश प्रवास केलेला नसतो किंवा परदेशाहून आलेल्या अशा कोणत्याही व्यक्तीशी तिचा संपर्क आलेला नसतो. म्हणजेच त्या व्यक्तीला कोरोनाची लागण नेमकी कुठून आणि कशी झाली, हे शोधणे कठीण होते. व्हायरसचा स्रोत समजत नसल्याने हा व्हायरस सर्वत्र पसरू लागतो.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतात या आधीच कोरोना व्हायरसचे कम्युनिटी ट्रान्समिशन झाले आहे, असा धक्कादायक दावा व्हायरोलॉजिस्ट शाहीद जमील यांनी केला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. जमील हे मोलक्युलर बायोलॉजी, संसर्गजन्य आजार आणि बायोटेक्नॉलॉजीतील तज्ज्ञ असून वेलकम ट्रस्ट/ डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी इंडिया अलायन्सचे ते सीईओ आहेत.
भारतात आता कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे, मात्र लॉकडाऊनेपेक्षा आयसोलेशन, क्वारंटाइन आणि टेस्टिंगवर भर द्यावा, असे देखील व्हायरोलॉजिस्ट शाहीद जमील यांनी सांगितले. तसेच, लॉकडाऊनचा पुढे काही फायदा होईल, असे मला वाटत नाही. देशव्यापी लॉकडाऊनपेक्षा स्थानिक लॉकडाऊन, आयसोलेशन आणि क्वारंटाइन योजनांवर भर द्यावा. सध्या लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे सर्वात महत्त्वाचे आहे, जेणेकरून लोकं नियमांचे पालन करतील.
१० लाख लोकसंख्येमागे १ हजार ७४४ कोरोना टेस्ट
“जगात आपल्या देशाचा टेस्टिंग रेट खूप कमी असून सध्या १० लाख लोकसंख्येमागे १ हजार ७४४ टेस्ट होत आहेत. आपल्याला अँटिबॉडी टेस्ट आणि आरटी-पीसीआर टेस्ट दोन्ही करायला हव्यात. यामुळे आपल्याला सध्याची संक्रमित प्रकरणे आणि आधी झालेली संक्रमित प्रकरणे याची माहिती मिळेल. रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनवरही सातत्याने निरीक्षण राहवं आणि त्यानुसार टेस्टिंग व्हायला हवी यामुळे आपल्याला आवश्यक ती माहिती मिळेल आणि आपली अर्थव्यवस्थाही सुरू करता येईल”, असेही जमील यांनी सांगितले.