करोनाच्या धोक्यामुळे बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या जगातील सर्वात मोठ्या टी-२० स्पर्धेचे १३ वे पर्व १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने आता ही स्पर्धा आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. आयपीएल यावर्षाच्या अखेरीस खेळवण्याबाबत बीसीसीआय विचार करत असून सामन्यांची संख्याही कमी होण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयची संघमालकांशी चर्चा
भारतामध्ये करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ४०० च्याही पार गेली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारीची विविध पावले उचलली जात आहेत. भारताच्या बऱ्याच राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले असून सर्व खेळही बंद करण्यात आले आहेत. ‘आम्ही दर आठवड्याला परिस्थितीचा आढावा घेऊनच आयपीएलबाबत अंतिम निर्णय घेऊ’, असे काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला होता. मात्र, आता करोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने आयपीएल आणखी लांबणीवर पडू शकते किंवा रद्द होऊ शकते. दरम्यान, बीसीसीआय आयपीएलच्या आठही संघांच्या मालकांशी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरंसद्वारे चर्चा करणार आहे.
हेही वाचा – Coronavirus: अरे बापरे, आता इंधनही मिळणार मर्यादित; वाचा किती रुपयाच मिळणार इंधन?