कोरोनाचं संकट असताना आसामवर आता पूराचं संकट आलं आहे. आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती झाली आहे. आसाममधील पुरामुळे हजारो लोक रस्त्यावर आले आहेत. आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आसाममधील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे आसाममध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आसाममधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर अनेक गावे पाण्यात बुडाली आहेत. याठिकाणी २० जिल्ह्यांना पूर आला असून ज्यामुळे राज्यात बाधित झालेल्यांची संख्या वाढून ६ लाख २ हजार झाली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, कोकराझार येथे एक आणि धुबरी येथे एकाचा मृत्यू झाला, त्यामुळे आतापर्यंत ६६ जणांचा या पूरजन्य परिस्थितीमुळे मृत्यू झाला आहे.
प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, धेमाजी जिल्ह्यात पूरचा सर्वाधिक फटका बसला असून त्यानंतर बारपेटा आणि लखीमपूर येथेही पूर आला आहे. चराईदेव, विश्वनाथ, बक्सा, नलबारी,चिरांग, बोंगाईगांव, कोकराझार, ग्वालपारा, मोरीगांव, नगांव, गोलाघाट आणि तिनसुकिया या जिल्ह्यांना देखील पूराचा फटका बसला आहे. राज्यात १ हजार १०९ गावे पाण्याखाली गेली आहेत तर ४६ हजार ८२ हेक्टर क्षेत्रात असलेली पीक पाण्याखाली बुडाली आहे.