लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून कॉंग्रेसच्या प्रचारात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींनी चांगलीच कंबर कसली आहे. तीन दिवसीय गंगा यात्रेवर असलेल्या प्रियांका गांधींनी दुसऱ्या दिवशी राज्यातल्या आणि केंद्रातल्या भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. सध्या प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशातील पूर्वेकडील जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून याच दरम्यान, बुधवारी वाराणसीमध्ये घोषणाबाजी वरुन भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे.
प्रियंकांचा हा तीन दिवसांचा दौरा सुरु असून बुधवारी त्या पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी येथे पोहोल्या. त्यावेळी रामनगर शास्त्री चौकातील लालबहादूर शास्त्रींच्या पुतळ्याचे त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत मोदीं विरोधात घोषणाबाजी केली आहे. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या भाजप समर्थकांनी विरोध दर्शवला आहे. यावरुन दोन्ही गटात बोलाचाली सुरु झाली आहे. पण बघता बघता हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली आहे.