सुप्रसिद्ध कवी मुनव्वर राणा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. ते नेहमी आपल्या वादग्रस्त लिखाणामुळे आणि वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता त्यांनी संसद भवनाच्या विषयावर केलेल्या ट्वीटमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. वाढत्या चर्चेमुळे मुनव्वर राणा यांनी आपले ट्वीट हटवले आहे. हे ट्वीट हटवण्याच्या आधीच काहींनी या ट्वीटचे स्क्रीनशॉट केले होते. हे स्क्रीनशॉट सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
ट्वीटमध्ये काय म्हटले आहे मुनव्वर राणा यांनी
कवी मुनव्वर राणा यांनी आपल्या वादग्रस्त ट्वीटमध्ये म्हटले आहे की, या देशातील काही लोकांना भोजनतरी मिळेल. संसद भवन जमिनदोस्त करुन त्या ठिकाणी शेती करावी. अशाप्रकारेच शेतकऱ्यांचे भवितव्य बदलेल. शेठांनी बनविलेले गोदाम जाळून टाका, मी खोट्या न्यायालयात सत्य सांगत आहे. माझी मान उडवा नाहीतर मला जाळून टाका किंवा जिवंत जाळा अशा आशयाचे ट्वीट मुनव्वर राणा यांनी केले आहे. या ट्विटमुळे वाद निर्माण झाला. यामुळे हे ट्विट काही वेळातच हटवण्यात आले आहे.
या ट्विटमुळे मोठा वाद निर्माण झाल्यामुळे मुनव्वर राणा यांनी याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. एका मुलाखतीत त्यांनी संसद भवनची जुनी इमारत पाडण्याच्या विषयावर बोलत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, जर नवीन संसद भवन बनवण्यात येत आहे. तर जुनी संसद भवनाची इमारत पाडली पाहिजे. ती जमीन शेती करण्यासाठी वापरली पाहिजे. असे केल्याने लोकांना पोटभर अन्न मिळेल. देशात आणीबाणी सुरु आहे. अशा स्थितीत कवी व्यक्त झाल्यास जनता टीका करतात.
कवी मुनव्वर राणा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि लिखाणामुळे सतत चर्चेत असतात. या आधीही फ्रांसमध्ये झालेल्या हल्ल्याबाबत मुनव्वर राणा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादात होते. त्यांनी फ्रान्समध्ये कार्टून बनवल्यामुळे झालेल्या हत्येबाबत वक्तव्य केले होते की, जर कोणी आमच्या आई आणि वडिलांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र काढल्यास आम्ही त्याचा जीव घेऊ परंतु तेव्हाही आपले वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात आल्यामुळे त्यांनी असे म्हटले होते की, हत्याकांडांचे कधीही समर्थन केले नाही.