दिल्ली आणि नवी दिल्लीमध्ये वायू प्रदुषणाने पुन्हा एकदा धोक्याची पातळी गाठली आहे. दिवाळीच्या दिवसांत मोठ्याप्रमाणावर फटाके उडवले जातात. याचाच परिणाम म्हणून सध्या राजधानीमध्ये प्रदुषित धुक्याची आणि धुराची लाट पसरली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार दिल्लीच्या हवेमधील मुख्य प्रदुषक घटक पीएम २.५ आणि पीएम १० हे थेट ९०० पर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे हवामान खात्याने हवेमधील कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण ८७ टक्के झाले असल्याची नोंद केली आहे. दिललीत दिवाळीपूर्वीच हवा शुद्ध करणारं एक मोठं यंत्र बसवण्यात आलं होतं. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे या यंत्रानेही काम करणं बंद केलं आहे. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांना कार्बन मोनॉक्साईड मिश्रीत विषारी हवेचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान, दिवाळीमुळे होणाऱ्या वायू प्रदुषणाचा फटका दिल्ली व्यतिरीक्त अन्य राज्यांनाही बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाचा: ‘ओवाळणी दिलीत तर याद राखा’; राज ठाकरेंचा टोला
काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीदरम्यान फटाके फोडण्याबाबत काही नियम घालून दिले होते. दिवाळीच्या दिवसांत रात्री केवळ ८ ते १० या वेळेतच फटाके उडवावेत, असा नवीन नियम सुप्रीम कोर्टाकडून जारी करण्यात आला होता. मात्र, दिल्लीसह देशातील अन्य काही राज्यात हे नियब धाब्यावर बसवल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी लोक वेळेपलीकडे जाऊन लोक फटाके उडवताना दिसत आहेत. दिल्लीमध्ये हरित फटाकेच वाजवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र, बाजारात हरित फटाके उपलब्ध नसल्याचे सांगत अनेकांनी पारंपारिक फटाकेच वाजवले. परिणामत: दिल्लीमध्ये वायू प्रदुषणाच्या पातळीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. ज्याचा त्रास दिल्लीकरांनाच सहन करावा लागतो आहे. दिवाळीत दिल्लीपाठोपाठ अन्य राज्यांमध्येही वायू प्रदुषणाची पातळी वाढू शकेत असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे.
#Delhi‘s Anand Vihar at 999, area around US Embassy, Chanakyapuri at 459 & area around Major Dhyan Chand National Stadium at 999, all under ‘Hazardous’ category in Air Quality Index (AQI) pic.twitter.com/QX7z5UYOl9
— ANI (@ANI) November 8, 2018