लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान १९ मे रोजी होणार आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या रणधुमाळीला हिंसक वळण लागले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने ठरलेल्या वेळेच्या एक दिवस अगोदर प्रचारसभांवर बंदी आणली आहे. ही बंदी गुरुवारी रात्री १० वाजेपासून सुरु होणार आहे. निवडणूक आयोगाच्या याच निर्णयावर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आक्षेप घेतला आहे. पश्चिम बंगालमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन प्रचारसभा आहेत. मोदींच्या या प्रचारसभांमुळेच निवडणूक आयोगाने सकाळच्या ऐवजी रात्री प्रचारसभांवर बंदी आणली आहे, असे मायावती म्हणाल्या आहेत.
नेमकं काय म्हणाल्या मायावती?
‘निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी रात्री १० वाजेपासून प्रचारबंदी होणार असल्याची घोषणा केली आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन प्रचारसभा आज पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. जर त्यांना खरच प्रचारसभांवर बंदी घालायची होती, तर त्यांनी आज सकाळीच का नाही बंदी घातली? हा पक्षपात आहे. निवडणूक आयोग दबावात काम करत आहे’, असे मायावती म्हणाल्या आहेत.
Mayawati: Election Commission has banned campaigning in West Bengal, but from 10 pm today just because PM has two rallies in the day. If they had to ban then why not from today morning? This is unfair and EC is acting under pressure pic.twitter.com/s7v0xpvAkO
— ANI (@ANI) May 16, 2019