गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम बंगालमधील प्रचाराच्या रणधुमाळीला वेगळे वळण लागले आहे. मंगळवारी कोलकाता येथे अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठा हिंसाचार झाला. या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये एक दिवस अगोदर प्रचारसभांवर बंदी आणली आहे. गुरुवारी रात्री १० वाजेपासून पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभांवर बंदी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या याच निर्णयावर कॉंग्रेसने टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या समोर निवडणूक आयोगाने शरणागती पत्करली आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन पश्चिम बंगालमध्ये सध्या सुरु असलेल्या परिस्थितीवर काँग्रेसच्या वतीने आपली बाजू मांडली आहे.
‘निवडणूक आयोगाचा हा निर्णय घटनाविरोधी’
रणदीप सुरजेवाल म्हणाले की, ‘निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये एक दिवस अगोदरच प्रचारसभांवर बंदी आणण्याचा निर्णय घटनाविरोधी आहे. याशिवाय पंतप्रधान मोदींच्या पश्चिम बंगालमध्ये आज (गुरुवारी) होणाऱ्या सभांचा विचार करुन गुरुवारी रात्रीपासून निवडणूक आयोगाने प्रचारावर बंदीची घोषणा केली आहे.’ यापुढे सुरजेवाल म्हणाले की, ‘देशातील निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया धोक्यात आली आहे. मोदींच्या विरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे सबळ पुरावे दिल्यानंतरही काही कारवाई झालेली नाही.’