माजी केंद्रीय अर्थमंत्री-गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांना अखेर ईडी (Enforcement Directorate) अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने अटक केली आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाने चिदम्बरम यांची अटकपूर्व जामिनाची मागणी करणाची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे ईडीचा चिदम्बरम यांना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला. आयएनएक्स कथित घोटाळ्याप्रकरणी चिदम्बरम यांना अटक करण्यात आली असून सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. मात्र, त्याचवेळी ईडीने देखील या प्रकरणी चौकशी सुरू केली असून चिदम्बरम सीबीआयच्या कोठडीत असतानाच ईडीने देखील त्यांच्या कोठडीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर ईडीच्या अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
Supreme Court says, “Granting anticipatory bail at the initial stage may frustrate the investigation….It’s not a fit case to grant anticipatory bail. Economic offences stand at different footing and it has to be dealt with different approach." https://t.co/L3j8ET8a6i
— ANI (@ANI) September 5, 2019
काय म्हणाले न्यायमूर्ती?
जामिन अर्ज फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने त्याचं कारण देखील स्पष्ट केलं आहे. ‘सध्या प्रकरणाची चौकशी प्राथमिक स्तरावर आहे. आत्ताच अटकपूर्व जामीन देणं चौकशीमध्ये अडथळा निर्माण करू शकतं. शिवाय अटकपूर्व जामीन देण्यासाठी हे योग्य प्रकरण देखील नाही. आर्थिक गुन्हे हे एका वेगळ्या श्रेणीमध्ये येतात आणि त्यांना वेगळ्याच पद्धतीने हाताळणं गरजेचं असतं.’
हेही वाचा – होय, कार्ती चिदम्बरमने माझ्याकडे १० लाख डॉलर मागितले होते – इंद्राणी मुखर्जी
२१ ऑगस्टचा राडा!
२१ ऑगस्ट रोजी पी. चिदम्बरम यांना त्यांच्या दिल्लीच्या जोरबागमधील राहत्या घरातून आधी ताब्यात घेण्यात आलं होतं आणि नंतर रात्री उशीरा अटक करण्यात आली होती. त्यावेळी सीबीआयचे अधिकारी थेट त्यांच्या वॉल कम्पाऊंडवरून उड्या मारून आत शिरले होते. सुमारे दीड तास चाललेला हा सर्व राडा राष्ट्रीय तसेच प्रादेशिक वृत्त वाहिन्यांवरून आख्ख्या देशानं पाहिला होता. मात्र, तरीदेखील चिदम्बरम यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहे.