जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. फारुक अब्दुल्ला यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’ची घोषणा दिल्यामुळे त्यांना लोकांच्या रागाला सामोरे जावे लागले आहे. बुधवारी बकरी ईद असल्याने फारुक अब्दुला काश्मीरच्या मस्जिदमध्ये नमाज पठण करण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना नमाज पठण करण्यात विरोध करत काही लोकांनी धक्काबुक्की केली. ऐवढेच नाही तर त्यांच्यावर चप्पल फेकीचा देखील प्रयत्न केला गेला. विरोध आणखी वाढत चालल्याचे पाहून शेवटी फारुक अब्दुला निघून गेले.
Today, the time has come to have a peaceful dialogue between India and Pakistan. There is a need to get rid of hatred. This country belongs to Hindus, Muslims, Sikhs and Christians and all those who live here: Farooq Abdullah pic.twitter.com/EUJAczRF9c
— ANI (@ANI) August 22, 2018
फारुक अब्दुल्लांवर चप्पलफेक
ईद-उल-अजहा म्हणजे बकरी ईदच्या मूहूर्तावर आज हजरतबल मस्जिदमध्ये माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला नमाज पठणासाठी आले होते. त्याठिकाणी त्याच्याव्यतिरिक्त शेकडो नागरिक नमाज पठणासाठी आले होते. नमाज पठण सुरु होण्याआधीच काही लोकांनी गोंधळ घातल फारुक अब्दुल्लांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. काही लोकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली तर काहींनी त्यांच्यावर चप्पल फेक देखील केली. विरोध करणाऱ्या लोकांनी मस्जिदमधून फारुक अब्दुल्ला यांना निघून जाण्यास सांगितले.
मी कोणाला घाबरणारा नाही
या घटनेनंतर फारुक अब्दुल्ला यांनी मी कोणाला घाबरलो नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. “जर डोकेफिरुंना वाटत असेल की फारुक घाबरला तर ती त्यांची चूक असेल. मला भारत माता की जय बोलायला कोणी रोखू शकत नाही” असे फारुक अब्दुल्ला यांनी सांगितले आहे आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतीपूर्ण चर्चा करण्याची वेळ आली आहे. द्वेषातून बाहेर येण्याची गरज आहे. हा देश हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई आणि इथे राहणाऱ्या सर्वांचा आहे. भारत पुढे जात आहे आणि काश्मीरला देखील आपल्या पायावर उभे राहावे लागेल. विरोध करायचा होता तर दुसरी वेळ ठरवायची होती. नमाज पठणा दरम्यान असे करणे चूक असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. ‘भारत माता की जय’ च्या विरोधाने स्वातंत्र्य मिळत असेल तर बेरोजगारीपासून स्वातंत्र्य मिळवा असे देखील त्यांनी म्हटले आहे.
भारत माता की जय ची केली होती घोषणा
फारुक अब्दुल्ला यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रध्दांजली कार्यक्रमामध्ये उपस्थित लोकांकडून भारत माता की जय आणि जय हिंदच्या घोषणा बोलून घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांना आज लोकांच्या रागाचा आणि द्वेषाचा सामना करावा लागला. या सभे दरम्यान फारुक अब्दुल्ला यांनी उपस्थित लोकांना माझ्यासोबत एक घोषणा करा असे सांगितले होते. त्यावेळी त्यांनी सर्वांसोबत भारत माता की जय आणि जय हिंदची घोषणा करत भाषण संपवले होते.