पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय कमांडर अभिनंदन वर्धमान यांची उद्या १ मार्चला भारतात सुखरुप पाठवणी केली जाणार आहे. अभिनंदन यांना आपल्या देशात सुखरुप परत आणावे अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण देशातून केली जात होती. तमाम देशवासीय अभिनंदन यांच्या परतीकडे डोळे लावून बसले होते. दरम्यान, तिकडे पाकिस्तानही कुणीतरी अभिनंदन यांच्या भारतातील पाठवणीबाबत मागणी करत होते. ही मागणी केली होती पाकिस्तानचे माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांची भाची फातिमा भुट्टो यांनी. फातिमा भुट्टो यांनी ‘विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सुरक्षितपणे भारताकडे सोपवले जावे’, अशी मागणी इम्रान खान सरकारकडेकेली होती. फातिमा या बेनजीर भुट्टो यांचा भाऊ मुर्तजा भुट्टो यांच्या कन्या आहेत. तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फीकार अली भुट्टो यांची नात आहेत.
काय म्हणाल्या फातिमा?
फातिमा एक लेखिका आहेत. फातिमाने भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेसाठी एका इंग्रजी वृत्तपत्रात एक लेख लिहीला आहे.या लेखात त्यांनी म्हटलं आहे, की ‘आम्ही युद्धात संपूर्ण आयुष्य घालवले आहे. मी पाकिस्तानी आणि भारतीय जवानांना मरताना पाहू शकत नाही. माझ्या पीढीच्या पाकिस्तानींनी आपले मत मांडण्यासाठी एक लढाई लढली आहे. आम्ही शांतीसाठी आपले मत, विचार मांडण्यासाठी घाबरत नाही. फातिमा यांनी सोशल मीडियावरुनही याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्हाला देखील शेजारी देशाशी मैत्रीपूणै संबंध प्रस्थापित करायचे आहेत’, अशा शब्दात फातिमाने त्यांचे विचार मांडले आहेत. दरम्यान, अभिनंदन यांच्या सुटकेच्या निर्णयामुळे संपूर्ण भारतात आनंदाची लाट पसरली आहे.