बकरी ईद आणि स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशात दहशतवाद्यांकडून घातपात घडवण्याचा कट असल्याचा इशारा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, दिल्लीसह १५ शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे देशभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून संवेदनशील ठिकाणांवर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
याठिकाणी दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची शक्यता
काश्मीर, पूर्वोत्तर भारतातील शहरांवर दहशतवाद्यांकडून मोठा हल्ला होण्याची शक्यता आयबीने व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारने ३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पाकिस्तानाकडून देखील या निर्णयाला विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित डोवाल काश्मीर, अनंतनागच्या दौऱ्यावर आहेत.
समुद्री जिहादाचा कट
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामासारखी घटना घडण्याचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून समुद्री जिहादाचा कट रचला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची आमची तयारी आहे, असे भारतीय नौदलाने स्पष्ट केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी दहशतवादी समुद्रमार्गे भारतात हल्ला करण्याची शक्यता असल्याचे दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर समोर आले आहे. त्यामुळे सध्या सागरी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा – केरळमध्ये पावसाचा कहर; ५७ बळी