मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा ऑनर किलिंगचा प्रकार घडला आहे. प्रेम विवाह करणाऱ्या मुलीला वडिलांनी जिवंत जाळल्याची घटना मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील चैनपूर गावात घडली आहे. या मुलीचे नाव लक्ष्मी असे असून ती १९ वर्षांची होती. परिवाराच्या मनाविरुद्ध लग्न करणाऱ्या लक्ष्मीला तिच्या वडिलांनी जिवंत जाळले. या इसमाचे नाव सुंदर लाल असे आहे. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भारतात आजही पुरूषप्रधान संस्कृती जिवंत असून देश अजूनही रुढी, परंपरांमध्ये जखडला असल्याचे सिद्ध झाले आहे.
कुटुंबियांची नाराजी
प्रेम विवाह करण्याच्या विचारावर घरचे सर्वच सदस्य लक्ष्मीवर नाराज होते. सकाळी जेव्हा ती घरातून बाहेर पडत होती, तेव्हा तिच्या वडिलांनी तिला घट्ट पकडले आणि तिच्या अंगावर रॉकेल ओतून आग लावली. लक्ष्मी जोरजोरात ओरडू लागली. लक्ष्मीच्या ओरडण्याच्या आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी आले. या लोकांनी ताबाडतोब पोलिसांना फोन लावला. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणावर कारवाई सुरु केली. पोलिसांनी लक्ष्मीचे वडील सुंदर लाल यांना अटक केली.
कोर्ट मॅरेज करण्यासाठी निघाली होती लक्ष्मी
लक्ष्मीचे तिच्या घरासमोर राहणाऱ्या मुलावर प्रेम होते. त्यामुळे ती त्या मुलासोबत लग्न करणार होती. परंतु, तिच्या घरच्यांना हे लग्न अमान्य होते. ते या लग्नाला विरोध करत होते. त्यामुळे शुक्रवारी सकाळी मुलगी आपले मार्कशीट घेऊन कोर्ट मॅरेज करायला जात होती. दरम्यान, तिच्या वडिलांनी तिचा हात पकडला आणि हा सगळा प्रकार घडला.