पाकिस्तानच्या बालाकोटा येथील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे. या हल्ल्यामध्ये २०० ते ३०० दहशतवनाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय वायू सेनेला यश आले आहे. दरम्यान, पाकिस्तानवरील हल्ला खोटा आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते विनोद कुमार उर्फ पंडित सिंह यांनी केला आहे. विनोद कुमार हे उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आहेत. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या तळावर केलेला हवाई हल्ला हा खोटा असून, असे काही घडलेच नाही, असे विनोद कुमार म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशच्या गोंदा येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या एका कार्यक्रमात त्यांनी हा आरोप केला आहे.
‘पडक्या घरावर एकदोन बाँब टाकला’
विनोद कुमार म्हणाले की, ‘पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या तळावर केलेला हवाई हल्ला हा खोटा आहे. भाजप नेते खोटारडे आहेत.’ त्याचबरोबर ‘हल्ला होणार हे १० दिवसांपासून माहीत होतं. १० दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये हातमिळावणी झाली होती आणि एखाद्या पडक्या घरात एक-दोन बाँब टाकण्याचा निर्णय झाला होता’, असा आरोप त्यांनी केला आहे.