भारतात साधारणत: ठरलेल्या वेळेपेक्षा उशीराने रेल्वे येण्याचे आणि सुटण्याचे किस्से रोजच घडत असतात. रेल्वेला ‘तासभर’ उशीर होतोय ही एक साधारण बाब म्हणून समजली जाते. मात्र जपानमध्ये असं काही होत नाही. एक रेल्वे फक्त २५ सेकंद लवकर सुटली म्हणून जपानच्या रेल्वे प्रशासनाला माफी मागावी लागली आहे. हे फक्त जपानमध्येच होऊ शकते, भारतीय रेल्वेला हे कधी जमणार? असा प्रश्न तुमच्या मनात नक्की निर्माण झाला असेल.
झाले असे की, शुक्रवारी सकाळी जपानच्या नोटोगोवा रेल्वे स्थानकावर ७.१२ ला सुटणारी गाडी उभी होती. गाडी सुटण्याची वेळ झाली असा गैरसमज होऊन मोटरमनने ७.१२ ची गाडी २५ सेकंदाअगोदरच म्हणजे ७.११.३५ ला सोडली. गाडीचे दरवाजे बंद झाल्यावर मोटरमनला आणखी काही सेकंद थांबायला हवे असे वाटले होते. परंतु फलाटावर कुणीही व्यक्ती न दिसल्याने त्याने गाडीचा वेग वाढवला. गाडी सुरु झाल्यानंतर एक प्रवासी फलाटावर आला. परंतु गाडी नियोजित वेळेनुसार २५ सेकंद आधीच सुटल्यामुळे त्या प्रवाशाने नोटोगोवा रेल्वे स्थानक प्रशासनाकडे याबद्दल तक्रार केली.
त्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी ही तक्रार रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नेली. अखेर जपान पश्चिम रेल्वेने संबंधित प्रवाश्याची माफी मागितली. “आमच्याकडून आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. यापुढे आम्ही याची काळजी घेऊ”, अशा शब्दांमध्ये रेल्वेने माफी मागितली. रेल्वेचा हा माफीनामा दुसऱ्या दिवशी जपानमधील वृत्तपत्रांमध्ये छापून आला. या माध्यमातूनच ही बातमी जगभर पसरली.