जेट एअरवेजच्या २० हजार कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदतीची हाक दिली आहे. सध्या जेट एअरवेज ही विमान कंपनी मोठ्या आर्थिक संकटांना सापडली आहे. या कंपनीने गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या कर्मचाऱ्यांना पगार दिलेला नाही. हा पगार मिळावा म्हणून कर्मचाऱ्यांनी कंपनी विरोधात आंदोलन पुकारले होते. त्यामुळे कंपनीने १५ एप्रिलपर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सर्व उड्डाण रद्द केले आहेत. या कंपनीचे स्टेट बॅंक सोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघून बॅंकेकडून कंपनीला कर्ज मिळाले तर सर्व कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा थकलेला पगार मिळू शकणार आहे. यासोबतच कंपनीचे कामकाज पूर्ववत सुरु होऊ शकते.
काय आहे नेमकं प्रकरण?
जेट एअरवेज ही विमान कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. या कंपनीवर ८०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पगारसाठी आंदोलन केले होते. वेतन नाही तर काम नाही, असा पवित्रा कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. मात्र, सोमवारी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले आहे. कारण सोमवारी जेट एअरवेजचे मालक आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. स्टेट बॅंकने आतापर्यंत जेट एअरवेजला १५०० कोटी रुपयांच्या रिलीफ फंडपैकी २०० कोटी रुपये कर्ज दिले आहे. या रिलीफ फंडमधली आणखी रक्कम जेट एअरवेजला मिळावी म्हणून आज ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. बॅंकेने ही रक्कम दिली तर कर्मचाऱ्यांना त्यांचा थकलेला पगार मिळणार आहे. याशिवाय त्यांना कामावर पुन्हा रुजू होता येणार आहे. आपली नोकरी वाचावी, यासाठी जेट एअरवेजच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदतीची हाक दिली आहे. २० हजार लोकांच्या नोकरीसाठी मोदीजी मदत करा, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. त्यामुळे मोदी या कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून येतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.