कलम ३७० हटवल्यापासून जम्मू–काश्मीरमधले वातावरण तणावपूर्णच होतं. तिथल्या अनेक भागांमध्ये जमावबंदी देखील करण्यात आली होती. मात्र, आता हळूहळू खोऱ्यातलं वातावरण पूर्वपदावर येत असल्याचं आशादायी चित्र निर्माण झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी जम्मू–काश्मीरच्या दौऱ्यावर निघाले होते. विरोधी पक्षांचं एक शिष्टमंडळ श्रीनगरला भेट देण्यासाठी गेले असताना शिष्टमंडळाला शनिवारी विमानतळावर रोखण्यात आले. त्यानंतर जवळपास तीन तासांमध्ये सर्व विरोधी नेत्यांची विमानतळावरूनच दिल्लीला परतपाठवणी करण्यात आली. यादरम्यान विमानातील प्रवासादरम्यानच एका काश्मिरी महिलेने राहुल गांधींसमोर आपल्या समस्या मांडल्या. राहुल गांधींसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचताना या महिलेने हंबरडाच फोडला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काँग्रेस प्रवक्त्या राधिका खेरे यांनीही हा व्हिडिओ ट्विट केला असून त्यासोबत ‘कश्मीर का दर्द सुनिए…’ अशी भावनिक पोस्ट केली आहे.
श्रीनगर से वापस आते वक्त फ्लाइट में एक महिला @RahulGandhi से अपनी मुश्किल बताते हुए। pic.twitter.com/f8mzgaskhx
— Arun Kumar Singh (@arunsingh4775) August 24, 2019
काय आहे या व्हिडिओत
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक काश्मिरी महिला राहुल गांधींसमोर काश्मीरची परिस्थिती आणि समस्या पोटतिडकीने मांडताना दिसत आहे. आम्ही खूप त्रस्त आहोत. आम्हाला खूप त्रास होत आहे, असं ही महिला या व्हिडिओमध्ये वारंवार सांगताना दिसत आहे. ‘शिक्षण घेणाऱ्या छोट्या छोट्या मुलांचंही घरातून बाहेर पडणं कठीण झाले आहे. अनेकदा एकमेकांना शोधायला बाहेर जाणाऱ्यांनाही पकडलं जाते. एका भावाला हृदयाचा त्रास आहे, पण १० दिवसांपासून त्यांनाही डॉक्टरांकडे तपासणीसाठी घेऊन जाता येत नाही आहे. आम्ही खूप त्रस्त आहोत‘, अशा शब्दांमध्ये आपली कैफियत मांडताना या महिलेला रडू कोसळतं. यानंतर तेथे उपस्थित काही महिला पत्रकार आणि इतर प्रवासी या महिलेचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अखेरीस तिचं सगळं बोलणं ऐकून घेतल्यावर राहुल देखील या महिलेचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करताना या व्हिडिओत दिसत आहे.
कश्मीर का दर्द सुनिए… pic.twitter.com/FRyg1Chifg
— Radhika Khera (@Radhika_Khera) August 24, 2019
कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच विरोधकांचं शिष्टमंडळ काश्मीरमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलं होतं. राहुल गांधींसह काँग्रेसचे गुलामनबी आझाद, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, ‘एलजेडी’चे शरद यादव, तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजिद मेमन यांच्यासह विरोधी पक्षांच्या १२ नेत्यांचे शनिवारी दुपारी श्रीनगर विमानतळावर आगमन झाले होते. पण विरोधकांच्या शिष्टमंडळाला विमानतळावरच रोखण्यात आले. त्यानंतर सर्व विरोधी नेत्यांची विमानतळावरूनच दिल्लीला परतपाठवणी करण्यात आली.
हेही वाचा – कर नाही तर डर कशाला?