घरदेश-विदेशकेरळ विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत

केरळ विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत

Subscribe

दुबईहून १९१ प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझीकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याने शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मुंबईतील वैमानिकासह १८ जणांचा मृत्यू, तर अनेक प्रवासी जखमी झाले. या घटनेच्या तपासाचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिले.

यावेळी त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना १० लाखांची, तर गंभीररित्या जखमी झालेल्या प्रवाशांना २ लाख रूपयांची आणि किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना ५० हजार रूपयांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा केली. हरदीपसिंह पुरी यांनी अपघातानंतर शनिवारी अपघात ठिकाणचा दौरा केला. तसेच परिस्थितीची माहितीही घेतली.

- Advertisement -

हे विमान शुक्रवारी रात्री ७.४१ वाजता कोझीकोडच्या करीपूर विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरले आणि खड्ड्यात कोसळले. हा अपघात एवढा भीषण होता की विमानाचे दोन तुकडे झाले. विमानाने उतरताना धावपट्टी सोडली आणि ते कुंपणाच्या भिंतीवर आदळून ३५ फुटी खड्ड्यात कोसळले. त्यामुळे त्याचे दोन तुकडे झाले, अशी माहिती नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) निवेदनाद्वारे दिली.

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार बोईंग-७३७ हे विमान धावपट्टीवरून घसरल्याने हा अपघात झाला. विमान उतरताना त्यात आग लागली नव्हती, असे नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने स्पष्ट केले. या विमानात १७४ प्रवासी, दहा बालके, दोन वैमानिक आणि पाच कर्मचार्‍यांचा समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -