कुलभूषण जाधव यांच्या केससंबंधी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या बाजून निर्णय दिल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत आपले मत मांडले आहे.
काय आहे ट्वीट
आम्ही कमांडर कुलभूषण जाधवला सोडणार नाही किंवा भारतात परतही जाऊ देणार नाही. या आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. जाधव हे पाकिस्तानी नागरिकांच्या विरोधात केलेल्या गुन्ह्यातील दोषी आहे. परंतू पाकिस्तान या प्रकरणी कायद्यानुसार जाणार आहे.
Appreciate ICJ’s decision not to acquit, release & return Commander Kulbhushan Jadhav to India. He is guilty of crimes against the people of Pakistan. Pakistan shall proceed further as per law.
— Imran Khan (@ImranKhanPTI) July 18, 2019
काय होता निर्णय
आंतरराष्ट्रीय न्याय कोर्टाने काल कुलभूषण जाधवप्रकरणी भारताच्या बाजूने निकाल दिला. कुलभूषण यांच्या फाशीवरील स्थगिती कायम ठेवताना, त्यांना झालेली अटक आणि त्यांच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे आदेश कोर्टाने पाकिस्तानला दिले. तसेच कुलभूषण जाधव यांना कॉन्सुलर असेस् (भारतीय दूतावासाशी संपर्क) देण्यात यावे, असेही कोर्टाने स्पष्ट केले. कुलभूषण जाधव यांना अटक करून पाकिस्तानने १९६३ सालच्या व्हिएन्ना कराराचा भंग केला आहे, असा दावा भारताने आंतरराष्ट्रीय न्याय कोर्टात केला होता. त्यावर सुमारे दीड वर्षांच्या सुनावणीनंतर आंतरराष्ट्रीय न्याय कोर्टाने भारताच्या बाजूने निकाल दिला.
कुलभूषण जाधव यांची सुटका नाही
भारताने आंतरराष्ट्रीय न्याय कोर्टात पाकिस्तानी लष्करी कोर्टाचा निर्णय रद्द करून जाधव यांची सुटका करावी. तसेच त्यांना सुरक्षित भारतात पोहचू द्यावे, अशी मागणी भारताने केली होती. या मागण्या मात्र कोर्टाने मान्य केल्या नाहीत. त्यामुळे कुलभूषण जाधव यांची सुटका होणार नाही. त्यांची सुटका करणे अथवा न करणे हे आता पाकिस्तानच्या हातात आहे.