देशातील शैक्षणिक वातावरण दूषित केले जात आहे, असे जेएनयू, जामिया, एएमयू आणि जाधवपूर विद्यापीठातील अलीकडच्या घटनांमधून दिसून येते. डाव्या विचारधारेशी जोडलेल्या संघटना आणि कार्यकर्त्यांनी शिक्षण क्षेत्रातील वातावरण बिघडवले आहे, असा आरोप शैक्षणिक क्षेत्रातील 200हून अधिक तज्ज्ञमंडळी आणि प्रतिष्ठित विद्यापीठांच्या कुलगुरूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्राद्वारे केला आहे.
देशभरातील अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांतील कुलगुरू आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ अशा एकूण जवळपास 208 जणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. विद्यार्थी राजकारणाच्या नावाखाली डावे अजेंडा राबवत आहेत, असे आम्हाला वाटते. कशा प्रकारे शैक्षणिक वातावरण खराब केले जात आहे हे अलीकडेच जेएनयूपासून ते जामिया आणि एएमयूपासून जाधवपूर विद्यापीठातील घडलेल्या घटनांमधून दिसून येते. यामागे डाव्या संघटनांमधील कार्यकर्ते आहेत. डाव्या संघटनांमधील काही कार्यकर्ते देशातील शैक्षणिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे पत्रात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार्यांमध्ये साऊथ बिहार सेंट्रल विद्यापीठाचे कुलगुरू एचसीएस राठोड, सरदार पटेल विद्यापीठाचे कुलगुरू शिरीष कुलकर्णी, हरि सिंह गौर विद्यापीठाचे कुलगुरू आर. पी. तिवारी यांचा समावेश आहे.
शैक्षणिक संस्थानांमध्ये डाव्या संघटनांच्या अराजकतेविरोधात निवेदन’ असे या पत्राला शीर्षक देण्यात आले आहे. या पत्रावर 208 शिक्षणतज्ज्ञांच्या स्वाक्षर्या आहेत.
तरुणांची दिशाभूल केली जातेय -पंतप्रधान
देशातील तरुणांची नागरिकत्व कायद्याबद्दल अफवा पसरवून दिशाभूल केली जात आहे, या कायद्याबाबत मुद्दाम तरुणांमध्ये संभ्रम निर्माण केला गेला. अनेक तरुण या अफवांचे बळी ठरले आहेत. त्या तरुणांना समजावून सांगणं हे आपले कर्तव्य आहे. हा कायदा नागरिकत्व हिसकावून घेणारा नाही, तर नागरिकत्व देणारा आहे, हा कायदा एका रात्रीत नव्हे, तर विचारपूर्वक तयार केला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते कोलकाता येथे बोलत होते.