सतराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. देशभरात ११ एप्रिल पासून मतदानाला सुरुवात झाली होती. यावर्षी एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडले. त्यापैकी पहिला टप्पा ११ एप्रिल रोजी संपन्न झाला. मतदानाचा ११ एप्रिल पासून सुरु झालेला हा प्रवास १९ मे रोजी संपला. १९ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि शेवटचा टप्पा पार पडला. आज म्हणजे २३ मे रोजी या सर्व मतदानाचा निकाल लागणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून देशभरातील मतमोजनीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत मोदी सरकार पुन्हा सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरेल का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. या निकालात सर्वात महत्त्वाची भूमिका देशातील ‘हिंदी भाषिक पट्टा’ बजावणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड या राज्यांमध्ये जो पक्ष अथवा राजकीय आघाडीला जास्त जागा मिळणार त्याची सत्ता दिल्लीत येणार हे नक्की आहे. २०१४ सालच्या निवडणुकीत या हिंदी भाषिक पट्ट्यात भाजपने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे देशात भाजपची सत्ता आली होती. आज येणार्या निकालाकडे म्हणूनच सर्व देशाचे लक्ष लागले आहे.