गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या महिला पत्रकारांकडून करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे आधीच अडचणीत आलेले माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर आता आणखीनच अडचणीत येण्याची शक्यता आहे. पत्रकार पल्लवी गोगोई यांनी केलेल्या बलात्काराच्या आरोपांना फेटाळून लावत त्यांनी गोगोई यांच्यासोबतच संबंध परस्पर सहमतीनेच होते असा खुलासा केला होता. मात्र, आता गोगोई यांनीच अकबर यांचा दावा फेटाळून लावला आहे. अकबर यांच्यासोबतचे संबंध परस्पर सहमतीचे नसून बळजबरीचे होते असा दावा गोगोई यांनी केला आहे.
वॉशिंग्टन पोस्टमध्ये लिहिला लेख
मीटू मोहिमेमध्ये अनेक महिलांसोबतच सध्या अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या पल्लवी गोगोई यांनी काही दिवसांपूर्वी अकबर यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. वॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकेतल्या प्रथितयश दैनिकात लिहिलेल्या लेखामध्ये त्यांनी हा आरोप केला होता. तो आरोप अकबर यांनी फेटाळून लावला होता. मात्र, आता गोगोई यांनी केलेल्या नव्या दाव्यामुळे पुन्हा एकदा संशयाची सुई अकबर यांच्याकडे रोखली गेली आहे.
गोगोई आरोपांवर ठाम
पल्लवी गोगोई यांनी ट्विटरवर हा दावा केला आहे. अकबर यांच्यासोबत मी सहमतीने संबंध ठेवलेच नाहीत. पदाचा दुरुपयोग करून बळजबरीने ठेवलेल्या संबंधांना सहमती म्हणू शकत नाही. अकबर आरोप मान्य करत नाहीत. पण मी आरोपांवर ठाम आहे, अशा शब्दांत पल्लवी गोगोई यांनी दावा केला आहे.
My statement: pic.twitter.com/7xoADdIHoX
— Pallavi Gogoi (@pgogoi) November 2, 2018
२३ वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा आरोप
१९९४ साली म्हणजेच तब्बल २३ वर्षांपूर्वी अकबर यांनी जयपूरमध्ये आपल्यावर बलात्कार केल्याचा दावा पल्लवी गोगोई यांनी केला आहे. त्यावेळी त्या एशियन एज या दैनिकामध्ये अकबर यांच्यासोबत काम करत होत्या. या प्रकरणासोबतच इतरही महिला पत्रकारांनी केलेल्या आरोपांनंतर एम. जे. अकबर यांनी पदाचा राजीनामा दिला.