पर्यावरणाशी होत असलेली छेडछाड हीच सध्या ज्याची सर्वांना धास्ती आहे, अशा निपाह विषाणूला जबाबदार असल्याचे विधान केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी केले आहे. ते सोमवारी छत्तीसगडच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी रायपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले.
बारा तासाच्या आत निपाह पीडितांना साहाय्य
नड्डा यांनी सांगितले की, “निपाह विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रातील काही डॉक्टरांची टीम लगेच केरळमध्ये गेली. या आजारावर नियंत्रण कसे मिळवता यावे यासाठी चर्चा करण्यात आली. त्यानंतर योग्य ते उपचारही करण्यात आले. डॉक्टरांची टीम बारा तासांच्या आत निपाह पीडित असलेल्या रुग्णापर्यंत पोहोचते आहे. त्यामुळे आता परिस्थिती नियंत्रणात आली असून, काळजी करण्याची आवश्यकता नाही.
नड्डा म्हणाले, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स), सफदरजंग हॉस्पिटल, पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि नॅशनल सेंटर फॉर डिसिज कंट्रोलचे केरळमधील डॉक्टरांच्या संपर्कात आहेत आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन करत आहेत.
केरळमध्ये निपाहमुळे बारा जूनपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद
केरळमध्ये निपाहमुळे आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूपासून सावधगिरीच्या उपाययोजनेसाठी कोझीकोडमधील शाळा आणि महाविद्यालयांना १२ जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.