रसत्यावर गाडी चालवताना काही नियम पाळावे लागतात पण अनेक लोकं या नियमांचा पालन करत नाहीत. घाई गडबडीत असल्यामुळे, निष्काळजीपणा किंवा कंटाळा केल्याने लोकांकडून हे नियम मोडले जातात. रसत्यावर जर वाहतूक पोलीस दिसले तर मात्र दंड वाचवण्यासाठी या नियमांचे पालन केले जाते. हेल्मेट तर चालकाच्या सुरक्षीततेपेक्षा वाहतूक पोलीस पकडतील याच भीतीनं घातलं जातं. या गोष्टीवर मात करण्यासाठी आणि वाहतुकीला नियंत्रणात ठेवण्यासाठी बंगळुरू वाहतुक पोलिसांनी एक नवीन उपक्रम राबवला आहे. बंगळुरूमध्ये ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांचं कपडे परिधान करून पुतळे उभारले गेले आहेत. या पुतळ्यांना वाहतूक पोलिस समजून लोक वाहतूकीचं नियम पाळतील असा या उपक्रमामागचा उद्देश आहे.
‘आजूबाजूला पोलीस नसल्यामुळे अनेक वाहन चालक वाहतूकीचे नियम मोडतात. तर लोकांना जवळ पोलीस दिसले तर ते नियम पाळतील म्हणून आम्ही हे पुतळे उभारले आहेत.’
– वाहतूक पोलिस प्रमुख
बंगळुरूमध्ये अशा प्रकारचे जवळपास ३० पुतळे ट्रायलकरता लावले गेले आहेत. बंगळुरूच्या वाहतूक पोलिसांच्या म्हणण्यानुसार अपघाताचे आकडे जरी कमी झाले असले तरी लोकं गाडी चालवताना सिग्नल तोडणे, फोनवर बोलणे, हेल्मेट न घालणे या सर्व गोष्टी वाहतूक पोलिसांच्या गैरहजेरीत सुरू असतात. बंगळुरूतील गाड्यांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वाहतुकीचं नियंत्रण करणे गरजेचे आहे. तर वाहतूक पोलीस प्रमुखांच्या म्हणण्यानुसार या पुतळ्यांची जागा नेहमीच बदलली जात आहे. जेणेकरून पुन्हा नियम तोडण्यापूर्वी वाहनचालक विचार करेल आणि इतर वाहतूक पोलिसांना त्यांची जास्त गरज असलेल्या ठिकाणावर लक्ष देता येइल.
वाहतुकीला नियंत्रणात ठेवण्यासाठी बंगलुरुमध्ये झालेला हा पहिलाच उपक्रम नाही. यापूर्वी २०१३ मध्ये वाहतूक पोलिसांनी कार्डबोर्डचे कटआउट्स शहरातील गजबजलेल्या ठिकाणी लावले होते. याबाबत त्यांच्यावर चेष्ठा गेली केली असून काही नागरिकांनी या उपक्रमावर चांगला प्रतिसाद दिला होता. ते म्हणाले होते की लोकांना हे कटआउट्स खरच पोलीस आहेत असं वाटत असल्यामुळे त्यांच्यात वाहतुकीची थोडी शिस्त आली आहे.