अनेकजण आम आदमी असल्याचा आव आणतात. पण आम आदमी असणे हे पर्रीकरांच्या स्वभावात होते. ते आपले संपूर्ण जीवन निरपेक्ष वृत्तीने जगले. मूल्य पाळायची ती अखेरच्या श्वासापर्यंत हे व्रत त्यांनी जपले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गोव्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मुंबईतील मित्रपरिवाराच्या वतीने आज स्वा. सावरकर स्मारक येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस यांनी पर्रीकरांच्या स्मृतींना उजाळा दिला.
From Defence Minister to Goa CM, this journey was about his absolute commitment towards nation & Goa. He was born for development of Goa in true sense. pic.twitter.com/nzTNmzR6aH
— Chowkidar Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 27, 2019
काय म्हणाले मुख्यमंत्री
“एखादी व्यक्ती तुलनेने कमी शासन करूनही किती मोठे कार्य करू शकते ते पर्रीकरांच्या उदाहरणावरून दिसून येते. ते गोव्याच्या राजकारणात सक्रीय झाले तेव्हा तेथे अस्थिर वातावरण होते. गुन्हेगारी, सुभेदारी वाढली होती. पर्रीकरांनी सत्तेवर आल्यानंतर पारदर्शी सरकार गोव्याला प्राप्त करून दिले. जनतेच्या मनातले गोवा राज्य साकारण्याचे काम मनोहर पर्रीकरांनी केले. आधुनिक पायाभूत सुविधा उभारून गोवा अग्रणी राज्य म्हणून देशासमोर आणले. माणूस प्रामाणिक असतो तेव्हा निर्णय घेण्यास घाबरत नाही. वेळोवेळी आवश्यक तिथे कणखर निर्णय घेऊन त्यांनी देशाच्या संरक्षण विभागाचे पूर्वापार स्वरूप बदलले. अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. मूल्याधिष्ठित राजकारण करता येते याचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे.” – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री