राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारच्या कटिहार मतदारसंघाचे खासदार तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच त्यांनी आपल्या खासदारकिचाही राजीनामा दिला आहे. आपल्या निवासस्थानी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. राफेल घोटाळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर संशय घेणे योग्य नाही, असे वक्तव्य सदर मुलाखतीमध्ये पवार यांनी केले होते. त्यामुळेच नाराज होऊन तारिक अन्वर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बिहारचे खासदार आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव तारिक अन्वर यांची पक्षाला सोडचिठ्ठी. त्यासोबतच खासदारकिचाही दिला राजीनामा. @NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule @nawabmalikncp #NCP pic.twitter.com/Ws4TYDZtde
— My Mahanagar (@mymahanagar) September 28, 2018
तारिक अन्वर पक्षाचे जुने नेते
खासदार तारिक अन्वर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मानले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनच ते पवार यांच्यासोबत होते. धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे असलेले अन्वर अल्पसंख्यांकाचे नेते म्हणून पक्षात प्रसिद्ध होते. याआधी पक्षाने त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले होते. २०१४ साली त्यांनी बिहारच्या कटिहार लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि चांगल्या मताधिक्याने त्यांचा विजयही झाला होता. तारिक अन्वर यांनी पक्ष सोडल्यामुळे अल्पसंख्यांक समाजात वेगळा संदेश जाऊ शकतो.
काय होते शरद पवार यांचे वक्तव्य
राफेल घोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यामुळे हाच प्रश्न एका मराठी वृत्तवाहिनीवर पवार यांना विचारला गेला. त्यावर पवार म्हणाले की, “मोदी यांच्या हेतूबाबत जनतेला कोणताही संशय नाही. मात्र सरकारने राफेल विमानांची किमंत जाहीर केली पाहीजे. तसेच संसदेच्या संयुक्त समितीद्वारे या प्रकरणाची चौकशी केली पाहीजे”.