देशाला सक्षम बनवायचं असेल आणि पुढे न्यायचं असेल तर आपल्याला स्थिर आणि निर्णायक सरकारची गरज असल्याचं मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मांडलं आहे. तर, आघाड्यांचं सरकार हे निर्णय घेण्यासाठी सक्षम नसतं असं मत देखील अजित डोवाल यांनी मांडलं. ऑल इंडिया रेडिओनं आयोजित केलेल्या सरदार पटेल स्मृती व्याख्यानामध्ये बोलत असताना त्यांनी हे मत मांडलं आहे. शिवाय, मागील चार वर्षामध्ये देशाची राष्ट्रीय इच्छाशक्ती जागृत झाल्याचं मत देखील डोवाल यांनी यावेळी मांडलं. लोकशाही ही भारताची ताकद आहे. तिला सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. कमकुवत लोकशाहीमध्ये देशाला कमकुवत बनवणाऱ्या प्रवृत्ती असतात. त्यामुळे भारताला पुढील काही वर्षे कमकुवत राहणं परवडणार नाही. असे मत देखील डोवाल यांनी यावेळी व्यक्त केले.
काय म्हणाले डोवाल
देशाला पुढे नेण्यासाठी कठोर निर्णयांची गरज आहे. पण, हे निर्णय लोकप्रियतेसाठी असावेत हे देखील गरजेचं नाही. त्यामुळे भारताला जर राजकीय, आर्थिल आणि सामाजिक उदिष्टं पूर्ण करायची असल्यास किमान पुढील दहा वर्षे देशाला स्थिर सरकारची गरज आहे. आघाड्यांचं सरकार देशासाठी चांगलं नाही. अस्थिर सरकार कोसळण्याची किंवा त्यामध्ये भ्रष्टाचार वाढण्याची भीती अधिक असते. त्यामध्ये स्थानिक राजकारणाचं हितच देशापेक्षा मोठं बनतं. अशी चिंता यावेळी अजित डोवाल यांनी बोलून दाखवली. राजकीय अस्थिरतेमुळं ब्राझील समोर अनेक संकटं असल्याचं उदाहरण देखील यावेळी अजित डोवाल यांनी दिलं. तसेच देशाच्या हितासाठी २०३० पर्यंत स्थिर सरकार आणि निर्णायक नेतृत्वाची गरज डोवाल यांनी बोलून दाखवली.