एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या निकालाची धाकधूक असताना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र आपल्या कार्यकर्त्यांना घाबरु नका असा सल्ला दिला आहे. शिवाय, २४ तास सतर्क राहण्याचे आवाहन देखील केलं आहे.
येत्या गुरुवारी म्हणजेच २३ तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहिर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. राहुल गांधींनी स्वत: ट्विट करत आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
कांग्रेस पार्टी के प्रिय कार्यकर्ताओं ,
अगले 24 घंटे महत्वपूर्ण हैं। सतर्क और चौकन्ना रहें। डरे नहीं। आप सत्य के लिए लड़ रहे हैं । फर्जी एग्जिट पोल के दुष्प्रचार से निराश न हो। खुद पर और कांग्रेस पार्टी पर विश्वास रखें, आपकी मेहनत बेकार नहीं जाएगी।
जय हिन्द।
राहुल गांधी
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 22, 2019
‘प्रिय कार्यकर्त्यांनो, पुढचे २४ तास महत्त्वाचे आहेत. सतर्क राहा. घाबरु नका. आपण सत्यासाठी लढत आहोत. एक्झिट पोलच्या चुकीच्या प्रचारामुळे निराश होऊ नका. स्वत:वर आणि काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा. तुमची मेहनत व्यर्थ नाही जाणार.’ अशा आशयाचं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
एक्झिट पोल्स किंवा व्हीव्हीपॅट या सर्व निवडणुकींच्या पद्धतींवर विरोधी पक्ष नेत्यांनी आधीच नाराजी व्यक्त केली आहे. अनेक एक्झिट्स पोलनुसार, भाजपप्रणित एनडीएलाच बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर मतदान यंत्रांमध्येही घोळ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे, मतपावत्यांची (व्हीव्हीपॅट) मतमोजणी सर्वात आधी केली जावी, त्यानंतरच उर्वरित यंत्रांमधील मतांची मोजणी व्हावी, अशी मागणी विरोधकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. याबाबत बुधवारी निर्णय घेतला जाईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते.
पण, व्हीव्हीपॅटच्या ५० टक्के मतमोजणीची विरोधकांची मागणी फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकूणच काँग्रेससह २१ विरोधी पक्षांच्या मागणीला निवडणूक आयोगाकडून केराची टोपली दाखवण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.