२०१९च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी नितीन गडकरींच्या हाती नेतृत्व द्यावं अशी मागणी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. एका जाहिर पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं २०१९ साली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हाती नेतृत्व सोपवावं असं किशोर तिवारी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. केशव तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, सहकार्यवाहक भैय्याजी जोशी यांना हे पत्र लिहिलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेला भाजपचा पराभव हा काही अहंकारी नेत्यांचा पराभव आहे. त्यांनी नोटाबंदी लादली, जीएसटी लागू केली, इंधनाच्या दरात वाढ झाली. या अहंकारी नेत्यांबद्दल सध्या पक्षात आणि बाहेर देखील असंतोष आहे. त्यामुळे गडकरींकडे २०१९ची धुरा द्यावी अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.
२०१९ साली भाजपला विजय हवा तर मवाळ नेता हवा. जो सर्वाना एकत्र घेऊन चालेल. तसा चेहरा केवळ नितीन गडकरी हेच आहेत. यापुढे जाऊन किशोर तिवारी यांनी पत्रामध्ये पाच राज्यांची जबाबदारी गडकरींकडे असते तर भाजपनं विजय नक्की मिळवला असता असं देखील म्हटलं आहे.
वाचा – नितीन गडकरी पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये?
राज तिलककी करो तैयारी…
‘राजतिलक की करो तैयारी आ रहे है नितीन गडकरी’ असे मेसेज देखील सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत. पाच राज्यांमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागल्यानं ही सारी चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाची देखील चर्चा रंगताना दिसत आहे.