गुरुवारी संध्याकाळी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) एअर स्ट्राईक करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचं वृत्त सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालं होतं. मात्र, आता भारतीय लष्करानंच असा कोणताही एअर स्ट्राईक भारतीय लष्करानं केला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई केल्याचं वृत्त खोटं आहे’, अशी प्रतिक्रिया भारताचे लष्करी कारवाईचे डीजी लेफ्टनंट जनरल परमजीत सिंग यांनी दिली आहे. त्यामुळे संध्याकाळपासून सुरू असलेल्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय लष्करानं पिनपॉइंट एअर स्ट्राईक केल्याचं वृत्त देखील काही प्रसारमाध्यमांमध्ये झळकलं होतं.
Reports of Indian Army's action in Pakistan-occupied Kashmir (PoK) across the Line of Control are fake: Indian Army Director General of Military Operations Lt Gen Paramjit Singh
(file photo) pic.twitter.com/uHlULDWydh— ANI (@ANI) November 19, 2020
गुरुवारी सकाळीच भारतीय लष्करानं नगरोटामध्ये केलेल्या कारवाईमध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट उधळून लावला होता. यामध्ये मेड इन चायना हँड ग्रेनेड वापरण्यात आल्याचं देखील समोर आलं होतं. त्यामुळे नक्की या हल्ल्याच्या मागे कोण होतं? यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा पुलवामासारखाच हल्ला करण्याची योजना होती का? असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवरच संध्याकाळी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये स्ट्राईक केल्याचं वृत्त आल्यामुळे या हल्ल्याचा बदला घेण्यासाठीच हा स्ट्राईक करण्यात आला होता, अशी आवई उठली. हे वृत्त व्हायरल झाल्यानंतर भारतीय लष्करानं त्यावर स्पष्टीकरण देऊन हल्ल्याचं वृत्त साफ खोटं असल्याचं स्पष्ट केलं आहे.