गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय सीमेवर विनाकारण गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानला काल भारताने चांगलाच धडा शिकवला. भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी गोळ्यांचा वर्षाव करत दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरामुळे सीमेपलीकडे पाकिस्तानी जवानांची दाणादाण उडाली. बीएसएफच्या कारवाईत पाकिस्तानच्या एका सैनिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर भेदरलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी कारवाई थांबवण्याची विनंती केली.
या कारवाईबाबत माहिती देणारी एक १९ सेकंदांची चित्रफीत बीएसएफने प्रसिद्ध केली आहे. या चित्रफितीमध्ये भारताच्या प्रत्युत्तरदाखल कारवाईत पाकिस्तानची एक चौकी उद्ध्वस्त होताना दिसत आहे. यासंदर्भात बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मू बीएसएफ फॉर्मेशनला फोन केला आणि गोळीबार थांबवण्याची विनंती केली. एका वरिष्ठ अधिकाèयाने सांगितले की, पाकिस्तानी सैन्याकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर विनाकारण गोळीबार आणि तोफांचा मारा करण्यात आला. त्यानंतर भारतीय जवानांनीसुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर दिले. अखेरीस पाकिस्तानी रेंजर्सनी बीएसएफला हा गोळीबार थांबवण्याची विनंती केली